। उरण । वार्ताहर ।
उरण ओएनजीसी कंपनीतील तेलगळतीची चौकशी करून बाधित शेतकरी व मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेतर्फे उरण तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे केली आहे.
शुक्रवार, दि.8 रोजी पहाटे चारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ऑईलची गळती झाली होती. सदर तेलाची गळती समुद्रात व शेतामध्ये गेल्याने त्याचे दुष्परिणाम दिसतील. प्रामुख्याने तेलाचे तवंग हे नागाव, केगाव, दांडा, खारखंड, करंजा आदी गावाजवळील किनारपट्टीवर पसरले आहेत. त्यामुळे समुद्रातील मासळी दूषित झाली आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी व मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यापूर्वीही अनेकवेळा अशाच प्रकारे गळती होऊन भीषण आग लागून चार जणांचा जागीच मृत्यू होण्याची घटना घडली होती. अशा घटना वारंवार घडूनही ओएनजीसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
तरी कंपनीतून वारंवार होणाऱ्या तेल गळतीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच बाधित शेतकरी व मच्छिमारांना ओएनजीसीमार्फत आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेने तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तहसीलदार उद्धव कदम यांनी लवकरच ओएनजीसी प्रशासनाबरोबर बैठक आयोजित करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन संघटनेला दिले. याप्रसंगी कोकण किनारा मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील, जनरल सेक्रेटरी भूषण पाटील, जयवंत तांडेल व मच्छिमार बांधव उपस्थित होते.