गडाच्या जतन आणि संवर्धनाची गरज
| बोर्ली | वार्ताहर |
गिरीमित्र प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने श्रीवर्धन तालुक्यातल्या वांजळे गावाजवळच्या वनदुर्ग मदगड किल्ल्यावर शनिवार, रविवार दि. दोन, तीन मार्च रोजी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘गिरीदुर्ग संवर्धनाय च: समर्पितम’ हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रातल्या गडदुर्गांच्या संवर्धनाचा वसा घेतलेल्या गिरीमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश कोयंडे यांच्या नेतृत्वाखाली राजू गोळे, शहाजी घाग, हेमंत लाड, मंगेश ठाकूर, अनिश खाडे आणि आरती गुरव या सात मावळ्यांनी मदगड किल्ल्याच्या संवर्धन मोहिमे अंतर्गत गडावरच्या अंतर्गत वाटांमध्ये उगवलेली छोटी झुडपं तोडून काही वाटा मोकळ्या केल्या. गडावरच्या काही भग्न अवशेषावर कित्येक वर्ष साठलेला पालापाचोळा बाजूला करून अवशेषांचं मूळ रूप समोर आणण्याचा प्रयत्न केला. अंदाजे तीस एकर क्षेत्र असलेल्या या वन दुर्गाचं संवर्धन करणं हे खरं तर एक मोठं आव्हानच आहे. इतिहासाच्या पाऊल खुणा आपल्या अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील या एकमेव गडाचं प्रामाणिकपणे स्वच्छता, डागडुजी, संवर्धन आणि जतन झालं तर पुढच्या पिढीला या गडाचा इतिहास समजण्यास मदत होण्याबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराची सुद्धा संधी प्राप्त होईल.
तरी पुरातत्त्व खात्याने आणि संबंधित यंत्रणांनी त्याचबरोबर स्थानिकांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन या गडाच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. या मोहिमेमध्ये वांजळे ग्रामस्थ भालचंद्र जाधव बोर्लीपंचतन शिवसेना शाखा प्रमुख गजू भाटकर यांचं सहकार्य लाभलं. वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले वांजळे गावचे सरपंच आत्माराम गायकर यांनी स्वतः गड चढून स्वच्छतेसाठी आलेल्या मावळ्यांचं कौतुक करून वांजळे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त केले. डिसेंबर 2020 साली रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान महिला, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या गडाची पायथ्याजवळून पाहणी करुन माहिती घेतली परंतू त्यानंतर या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. ज्या किल्ल्यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे, म्हणत आपण मिरवतो, दगडांच्या देशा म्हणत ज्या इतिहासामुळे आपण पेटून उठतो त्या किल्ल्यांची संबधीत विभागाच्या उदासिनतेमुळे गड प्रेमी, शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.