तामिळनाडूवर डावाच्या फरकाने विजय
| मुंबई | वृत्तसंस्था |
रणजी करंडक स्पर्धेची तब्बल 41 जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईने सेमी फायनलच्या लढतीत तामिळनाडूला एक डाव आणि 70 धावांनी नमवत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम लढतीत त्यांच्यासमोर विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्याचं आव्हान असणार आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर या विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबईने विक्रमी 48 व्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आगेकूच केली आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेची अंतिम लढत 10 ते 14 मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
एमसीए-बीकेसी मैदानावर झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत तामिळनाडूने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र गोलंदाजीसाठी पोषक अशा खेळपट्टीवर मुंबईच्या गोलंदाजांना तामिळनाडूच्या डावाला खिंडार पाडलं. विजय शंकर (44) आणि वॉशिंग्टन सुंदर (43) यांचा अपवाद वगळता तामिळनाडूच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यांचा डाव 146 धावांतच आटोपला. मुंबईकडून तुषार देशपांडेने 3 तर शार्दूल ठाकूर, मुशीर खान आणि तनुष कोटियनन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईची अवस्था 106/7 अशी झाली. पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर हे सगळे प्रमुख खेळाडू झटपट तंबूत परतले. साई किशोरच्या फिरकीसमोर मुंबईची अवस्था बिकट झाली होती. मात्र यानंतर शार्दूल ठाकूर आणि हार्दिक तामोरे यांनी आठव्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. हार्दिक 35 धावा करुन बाद झाला. शार्दूलला तनुष कोटियनची साथ मिळाली. या जोडीने नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने आव्हानात्मक खेळपट्टीवर तडाखेबंद फलंदाजी करत कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. शार्दूलने 109 धावांची खेळी केली. त्याने 13 चौकार आणि 4 षटकारांसह ही खेळी सजवली. शार्दूल बाद झाल्यानंतर तनुष कोटियन आणि तुषार देशपांडे यांनी शेवटच्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. मुंबईने 378 धावांची मजल मारली. तामिळनाडूतर्फे साई किशोरने 6 विकेट्स पटकावल्या. मुंबईला 232 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावातही तामिळनाडूच्या फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. बाबा इंद्रजीतने 9 चौकारांसह 70 धावांची एकाकी झुंज दिली. तामिळनाडूचा दुसरा डाव 162 धावांवर आटोपला. मुंबईतर्फे शम्स मुलानीने 4 तर शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, तनुष कोटियन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शतकासह चार विकेट्स पटकावणाऱ्या शार्दूल ठाकूरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.