लोकसभा मतदार संघामध्ये तब्बल 16 लाख 53 हजार 935 मतदारांचा समावेश आहे. यातील विशेष बाब म्हणजे 18-19 वयोगटातील 16 हजार 288 मतदार हे प्रथमच 17 व्या लोकसभेसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये 8 हजार 920 युवकांचा तर, 7 हजार 368 युवतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 8 लाख 40 हजार 416 महिला मतदार आहेत. हेच मतदार रायगडचा खासदार ठरवणार आहेत.
लोकसभेच्या निवडणुका शनिवारी जाहीर झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन देखील कामाला लागले आहे. तसे बघायला गेले, तर निवडणूक विभागाचे काम हे सातत्याने सुरुच असते. लोकसभेच्या निवडणुक पार पडल्यानंतर, विधानसभा, महापालिका, नगर पालिका/परिषद, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाचे काम हे निरंतर सुरुच असते. 2009 साली देशातील सर्व मतदार संघांची पुनर्रचना झाली होती. कुलाबा मतदार संघ बाद होऊन त्यांची जागा रायगड लोकसभा मतदार संघानी घेतली. रायगड लोकसभा मतदार संघाला रत्नागिरी जिल्ह्याचा काही भाग जोडण्यात आला. त्यामध्ये अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड या रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दोपोली विधानसभा अशा एकूण सहा मतदार संघाचा समावेश करण्यात आला.