जुन्या गाड्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
| बोर्लीपंचतन । प्रतिनिधी |
मिरज-श्रीवर्धन एस.टी. बसचा गोंडघर गावाजवळ अपघात झाल्याची घटना सोमवार (दि.8) एप्रिल रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडली. श्रीवर्धन आगाराची एम एच 20 बीएल 3171 हि गाडी सकाळी पावणेसात वाजता मिरजहून सुटून श्रीवर्धनकडे येत असताना गोंडघर गावानजीक गाडीचा पाटा तुटल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्ता सोडून खाली उलटली. गाडीमध्ये असलेल्या 34 प्रवाशांमधे महिलांची संख्या जास्त होती.
अपघाताची बातमी समजताच आसपासच्या ग्रामस्थांनी आणि दिघी सागरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याबरोबरच अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी योग्य ती मदत केली. गाडीच्या चालकासहीत किरकोळ जखमी झालेल्या 16 प्रवाशांवर बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर काही जखमींना पुढील उपचारासाठी श्रीवर्धन ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आलं. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी ही गाडी ज्या मार्गावरून आली त्या मार्गावरच्या महाबळेश्वर किंवा घोणसे घाटात हा अपघात झाला असता तर फार मोठी जीवितहानी झाली असती. या अगोदर या मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमधे कित्येक प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत तर काहींना कायमचं अपंगत्व आलं.
गेल्या वर्षभरात श्रीवर्धन आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्या रस्त्यामधे बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांसह चालक वाहकांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या बसची अवस्था जास्तच खराब असून नाईलाजाने चालकांना अशा गाड्या चालवायला लागतात तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून श्रीवर्धन आगारासाठी त्वरित नवीन गाड्या उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. अशा अपघाताचं गांभीर्य लक्षात घेऊन शासन किंवा महामंडळ श्रीवर्धन आगाराला त्वरित नवीन गाड्या देऊनफप्रवाशांच्या सेवेसाठीफ हे ब्रीद सार्थ ठरवेल कि अजून एखाद्या भयानक दुर्घटनेची वाट पाहिल अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या. सदर अपघाताचा तपास दिघी सागरी पोलीस करीत आहेत.