| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे पेण शहर. पेण शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन राज्यकर्त्यांनी 2010-11 च्या सुमारास पेण शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आंबेघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत घनकचरा व्यवस्थान प्रकल्प नियोजित केला. या खताला शासनाने ‘ग्रीन ब्रॅन्ड’ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत असा हरित ब्रॅन्ड दिला असल्याने राजाश्रय मिळालेला आहे. रायगड जिल्ह्यात नव्हे तर, कोकणातील घनकचरा व्यवस्थापनातून सेंद्रीय खत निर्माण करणारा हा अग्रगण्य प्रकल्प आहे.
पेण शहर हे आधुनिक नसून, ऐतिहासिक शहर आहे. झपाट्याने होत असणार्या शहरीकरणामुळे पेण शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भविष्यात एमएमआरडीईचा विचार करता पेण शहर हे तिसर्या मुंबईचे केंद्रस्थान होऊ पाहत आहे. पेण शहर हे ऐतिहासिक असल्याने सांडपाणी, घनकचरा विल्हेवाट लावणे हे तसं पाहता आव्हानात्मकच. परंतु, पेण शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन राज्यकर्त्यांनी 2010-11 च्या सुमारास पेण शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आंबेघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत घनकचरा व्यवस्थान प्रकल्प नियोजित केला. 2014 ला या प्रकल्पाचा शुभारंभदेखील झाला. परंतु, ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार ठेकेदाराने अटी व शर्तींचे पालन न ठेवल्याने हा प्रकल्प डबघाईस आला. परंतु, 2018 नंतर आलेल्या आरोग्य खात्यातील कर्मचार्यांनी मुख्याधिकार्यांच्या सल्ल्याने पुढाकार घेऊन हा प्रकल्प नव्याने सुरू करण्याचा विचार केला. साधारणतः हा पूर्ण प्रकल्प तीन एकर जागेमध्ये वसलेला आहे. पेण शहराच्या लोकसंख्येचा विचार करता शहरातून दररोज 15 मेट्रिक टन घनकचरा निर्माण होत आहे. यामध्ये 9 मेट्रिक टन ओला कचरा, 6 मेट्रिक टन सुक्या कचर्याचा समावेश आहे. हा संपूर्ण कचरा 10 घंटागाडीच्या सहायाने उचलला जाऊन तो हायटेक ट्रान्सफर सेंटर येथे नेण्यात येतो. नंतर त्या ठिकाणी कॉम्पॅक्टर कॅपसूल तंत्रज्ञानाद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करून आंबेगाव येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे नेण्यात येतो. येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते.
आंबेगाव येथे ओल्या कचर्यावर विंड्रो कंपोस्टींगद्वारे सेंद्रीय खत निर्मिती करण्यात येते. सिंपल प्रोसेसिंग मशीनद्वारे 24 तास प्रक्रिया करून सदर कचरा बारीक केला जातो. प्रक्रियेअंती या ओल्या कचर्याचे सेंद्रीय खत निर्माण होते. काही प्रमाणात दमट असल्याने त्याला स्क्रिनिंग मशीनमध्ये ते सेंद्रीय खत सुकवून चाळणीद्वारे गाळले जाते आणि नंतर त्या खताची पॅकिंग केली जाते आणि विक्रीसाठी ठेवले जाते. साधारणतः महिन्याला 10 ते 15 टन एवढी खतनिर्मिती केली जाते. या खताचा वापर पेण नगरपालिकेच्या गार्डनसाठी तसेच शेतकर्यांसाठीदेखील उपलब्ध करून दिला जातो. या खताला शासनाने ‘ग्रीन ब्रॅन्ड’ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत असा हरित ब्रॅन्ड दिला असल्याने या खताला राजाश्रय मिळालेला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी तसेच नर्सरी मालकांनी या खताची मागणी करावी जेणेकरून पेण येथे उत्पन्न केलेले सेंद्रीय खत पेणकरांच्याच उपयोगी येईल. पेण नगरपालिका फक्त 5 रूपये किलोने हे खत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरील खत प्रकल्प व्यवस्थापन करण्यामागे पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य अभियंता अंकिता इसाल, आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण आणि त्यांच्या सहकार्यांची मोठी मेहनत आहे. रायगड जिल्ह्यात नव्हे तर, कोकणातील घनकचरा व्यवस्थापनातून सेंद्रीय खत निर्माण करणारा हा अग्रगण्य प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भेट देण्याचे आवाहन आरोग्य अभियंता अंकिता इसाल आणि आणि आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण यांनी कृषीवलशी बोलताना केले आहे.