। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अलिबाग – मुरूड मार्गावरील रेवदंडा साळाव पुल जीर्ण झाल्याने त्याची दुरुस्ती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळासुरू होण्यासाठी पंधरा दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन महिने वाट पहावी लागणार असल्याचे समोर आले आहे.
अलिबाग – मुरूड व रोहा या तीन तालुक्यांना जोडणारा साळाव येथील पुल 36 वर्षाहून अधिक जूना आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या पुढाकाराने हा पुल उभारण्यात आला होता. रेवदंडा – साळाव पूलाचे काम 1986 मध्ये करण्यात आले. या पुलाची लांबी 510 मीटर इतकी आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलामुळे तीन तालुके जवळ आली. मुरूड, काशीद येथील पर्यटनाला चालना मिळाली. मात्र, रेवदंडा – साळाव पुल जीर्ण झाले होते. त्यांच्या भिंतीना तडे पडले होते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु आहे. डागडूजी, दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र, पावसाळा सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीदेखील या पुलाच्या दुरुस्तीचे व मजबूतीकरणाचे काम अद्यापपर्यंत पुर्ण झाले नाही. सध्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळदेखील प्रचंड आहे. संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे वाहनांना वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेवे यांच्या संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.
अजून तीन महिने प्रतिक्षा पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत तेथील कामगारांशी संवाद साधला, असता अजून काम पुर्ण होण्यास तीन महिने लागण्याची शक्यता आहे. सध्या पुलाच्या वरचा काम सुरु आहे. वाहने धावताना पुलावर त्याचा ताण पडू नये यासाठी दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे काम पुर्ण होण्यास पंधरा दिवस लागणार आहेत. पुलाच्या खालील भागाचे काम पंधरा दिवसानंतर सुरु केले जाणार आहे. त्यामुळे अजून तीन महिने वाट पहावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामाबाबत प्रवासी वर्गाकडून नाराजीचे सुर उमटत आहेत.
अधिकच झाला होता कमकूवत जुन्या असलेल्या या पुलाला मालवाहू बाजची धडक लागली होती. या धडकेने पुल अधिकच कमकुवत झाला होता. रेवदंडा साळाव पुल धोकादायक स्थितीत असल्याचे स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये दिसून आले. त्यामध्ये 11 खांबापैकी मधला चार खांब नाजूक स्थितीत होते, त्यामुळे या पुलाच्या तातडीने दुरुस्ती सुरु केली. सावित्री पुल दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. पाण्याखालील दुरुस्ती, एक्स्पांशन जॉईनींगचे काम अद्याप शिल्लक आहे.