| उरण | वार्ताहर |
जेनएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावाचे 40 वर्षांत पुनर्वसन झाले नाही. ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरम्यान, सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी आगामी पंचायर्तें जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. शुक्रवार, 3 मार्च 2023 रोजी शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेत ठराव पास करण्यात आला होता. त्या अनुषंगाने 2024 च्या लोकसभेच्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जाहीरपणे बहिष्कार टाकला होता. आता 20 नोव्हेंबर रोजी उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकावर शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे.
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर उरण तालुक्यातील अनेक गावे विविध सेवा सुविधांपासून आजही वंचित आहेत. शासनाकडे वर्षानुवर्षे शांततेच्या व कायदेशीर मार्गाने पत्रव्यवहार करूनसुद्धा शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने तसेच संप, आंदोलने, निदर्शने करूनसुद्धा ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन जाणूनबुजू दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
कोणत्याही राजकीय नेत्याने, लोकप्रतिनिधीने पुनर्वसनाचा प्रश्न केंद्र व राज्य शासनाकडून सोडविला नसल्याच्या निषेधार्थ हनुमान कोळीवाडा येथे दि. 3 मार्च 2023 रोजीच्या ग्रामसभेत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा एकमताने निर्णय घेऊन ठराव सुद्धा मंजूर केलेला होता. या ठरावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, विभागीय आयुक्त कोकण विभाग, पोलीस आयुक्त नवी मुंबई, जिल्हाधिकारी रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, कार्यालय उरण, न्हावा शेवा पोलीस ठाणे आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून माहिती सुद्धा दिले होते. पण हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या कोणत्याही मागणीची किंवा समस्याची दखल शासनाने घेतली नाही. कायदेशीर व शांततेच्या मार्गाने वारंवार संप, आंदोलने पत्रव्यवहार करून सुद्धा शासन हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत नसल्याने व वर्षानुवर्षे सतत फसवणूक करत असल्यामुळे आगामी होणार्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडाचे अध्यक्ष सुरेश दामोदर कोळी व उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी यांनी सांगितले.
गेली 40 वर्षे शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावाचे कायदेशीर पुनर्वसन, विस्थापितांना बंदर प्रकल्पात नोकर्या व विस्थापितांचे संविधानाने दिलेले हक्क मिळवून देण्यासाठी कोणत्याच राजकीय पुढार्यांनी सहकार्य केले नसल्याने येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )गावात कोणीही येऊ नये. अन्यथा कोणताही विचित्र प्रकार घडल्यास किंवा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास ते स्वतः जबाबदार असतील, असा इशारा शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्या महिलांनी दिलेला आहे.
कोणत्याही राजकीय नेत्याने, लोकप्रतिनिधीने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाकडे प्रयत्न केलेले नाहीत. याविषयी ग्रामस्थांच्या मनामध्ये चीड आहे. प्रशासन नेहमी दुर्लक्ष करत आहे. गेली 36 वर्षांपासून शासन आम्हाला फसवत आहे त्याचा निषेध म्हणून आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरेश कोळी, अध्यक्ष,
ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा







