दुबई येथे सुरु असलेल्या टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत टीम इंजियाची जी दारुण दुरवस्था झालेली आहे ती पाहता आता भारतीय क्रिकेट संघात बीसीसीआयने मोठे फेरबदल करणे गरजेचे बनलेेले आहे. मराठीत एक म्हण आहे घोडा का अडला, भाकर का करपली तर ती न फिरविल्याने. तशीच अवस्था आता टीम इंडियाची झालेली आहे. कारण संघातील जे जे बडे प्रस्थापित खेळाडू आहेत त्यांना असे वाटू लागले आहे की आपण म्हणजे संघ. त्यामुळे संघासाठी खेळलो काय आणि नाही खेळलो काय, फरक काय पडतोय आपल्याला अशी ही गर्विष्टपणाची भूमिका निर्माण झाली आहे त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय क्रिकेटची वाताहात झालेली आहे. दुबईतील पहिल्याच सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने भारताला दारुण पराभूत करुन जमिनीवर आणले. दुसर्या सामन्यातही न्यूझीलंडने भारताला पराभूत करुन स्पर्धेतील अस्तित्व टिकवायचे की नाही हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण करुन ठेवलाय. साखळी सामन्यात टीम इंडियाने दुबळ्या स्कॉटलंडवर विजय मिळवला असला तरी हा विजय भारतीय संघाला काही अंतिम फेरीपर्यंत अस्तित्व दाखविण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही. एकप्रकारे भारत साखळी फेरीतच बाद झालाय असं म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. भारतीय संघाची अशी ही दुरवस्था का झाली याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आता बीसीसीआयला निर्माण झालेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशात आता खरोखरच अति क्रिकेट झाले आहे. आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून क्रिकेटपटूंना जणू पैशांची खाण मिळाली असल्यासारखे झाले आहे. त्यामुळे टीम इंडियातील प्रत्येक क्रिकेटपटू आयपीएलसारख्या व्यावसायिक स्पर्धांना प्राधान्य देऊन तेथे आपली चुणूक दाखवितोय. पण त्याचवेळी विरुद्ध देशांसमवेत क्रिकेट खेळण्याची वेळ येते त्यावेळी हेच क्रिकेटपटू नांगी टाकताना दिसतात. याचाच अर्थ क्रिकेटपटूंना आता देशाकडून खेळण्यात रस राहिलेला नाही. त्यात कर्णधारपदावरुन विराट कोहली, रोहित वर्मा, के.एल,राहूल यांच्यात सुरु असलेली जोरदार रस्सीखेच. त्यावरुन थेट मैदानात विराट आणि राहूलचे झालेले वाद हे सुद्धा टीम इंडियाच्या पराभवाचे एक कारण असू शकते. विराट कोहली याचेे वागणंही आता टीम इंडियातील अन्य सहकार्यांना नकोसे वाटू लागलेले आहे.विराटने बॉसची भूमिका बजावताना टीमचा विचार करुनच निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ड्रेसिंगरुममध्ये जी सामुहिक चर्चा होणे अपेक्षित आहे ती होताना दिसत दिसत नाही. मी म्हणजेच संघ आणि मी सांगेल तोच निर्णय असेल तर ते अत्यंत चुकीचेच ठरते आणि त्याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागतात. तसाच प्रकार टीम इंडियाच्या बाबतीत घडलाय. यासाठी बीसीसीआयने आता ठोस भूमिका घेत संघातील जे प्रस्थापित खेळाडू आहेत त्यांना संघातून थेट घरचा रस्ता दाखवून नवीन चेहर्यांना संधी दिली तर पुन्हा एकदा टीम इंडिया भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव, विरेंद्र सेहवाग यांनी देखील संघातल्या अनेक नवोदित खेळाडूंना आत्तापासूनच पुढील वर्ल्डकपसाठी तयार करायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी संघातल्या सीनिअर खेळाडूंना आराम देऊन नवोदित खेळाडूंना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असं सुचित केलेले आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू कदाचित पुढच्या विश्वचषकात असतील. या खेळाडूंना तयार करून त्यांना संधी द्यायला हवी. कारण तेच भारतीय क्रिकेटचं भविष्य आहेत. त्यामुळे उरलेल्या अनुभवी खेळाडूंना ब्रेक देता येईल. जेणेकरून देशात किंवा विदेशात होणार्या टी-20 सीरिजमध्ये हे खेळाडू खेळू शकतील. यातून मिळणार्या अनुभवाच्या जोरावर हे खेळाडू स्वत:ला पुढच्या विश्वचषकासाठी तयार करू शकतील, असं सेहवाग याचं म्हणणे आहे. अर्थात त्यात गैर असं काहीच नाही. कारण मैदानावर खेळताना खेळाडूंना आपला परफॉर्मर्स दाखविता आलाच पाहिजे. जर जमत नसेल, वय वाढले असेल तर प्रत्येक ज्येष्ठांनी आपणहूनच मागे फिरणे हिताचे आहे.याचा विचार टीम इंडियातील ज्येष्ठांनी करणे गरजेचे आहे. कारण नवीन पालवी फुटायची असेल तर आधी जुन्या पानांनी गळून पडणे गरजेचे आहे.तरच नवीन निर्मिती होत राहील. टीम इंडियात विश्वविजेता बनण्याची निश्चित क्षमता आहे. यापूर्वीही भारत टी ट्वेन्टीमध्ये विश्वविजेता बनलेला आहे. तो दबदबा कायम ठेवायचा असेल तर संघाची फेररचना होणे गरजेचे आहे. याचा विचार बीसीसीआय, निवड समिती आणि ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी केला तर निश्चितच टीम इंडियाला पुन्हा चांगले दिवस येतील. शेवटी क्रिकेट हा खेळच आहे.त्यात हारजित होतच राहणार. पण पराभव देखील सहन करताना तो लक्षात राहणारा असेल तर हरुनही तुम्ही जिंकल्यासारखेच असता. पण सुरुवातीपासूनच नांगी टाकत राहिलात तो पराभव आयुष्यभर जिव्हारी लागतो, हे टीम इंडियाने लक्षात ठेवणे उचित ठरेल.