| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील तसेच वाकण-पाली -खोपोली मार्गाकडे येण्या-जाण्यासाठी महत्वाचा नाका म्हणून वाकण नाक्याची ओळख असून, वाकण नाक्यावर अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरून तसेच वाकण-पाली-खोपोलीकडे येणाऱ्या -जाणाऱ्या गाड्या चहा – नाष्टा करण्यासाठी नाक्यावरील हॉटेलच्या समोर बिनधास्तपणे उभ्या करतात. परिणामी त्याचा त्रास स्थानिक वाहनचालकांसह पादचाऱ्यांना होत आहे. वाकण नाक्यावर वाहतुकीच्या दृष्टीने गजबजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या पाहता वाकण नाका हा वाहतुकीच्या दृष्टीने पार्किंगसाठी अपुरा ठरत आहे. त्याच्यातच या नाक्यावरुन मोठ्या प्रमाणात प्रमाणापेक्षा जास्त भरलेल्या डंपरमधून कोळशाची देखील वाहतुक होत आहे. ही वाहतुक दिवसभर सुरू असते. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला हॉटेल्स असल्यामुळे या ठिकाणी थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असून, अनेक वेळा अपघात सुद्धा घडत आहेत. अनेकदा तर वाहनचालकांमध्ये शुल्लक कारणांवरुन वाद होण्याच्या घटना घडत आहेत. वाहतुकोंडीवरती नियंत्रण करण्यासाठी वाकण नाक्यावर पोलीस चौकी कार्यरत आहे. पंरतु, पोलीस असूनही वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली पहावयास मिळतात. त्यामुळे वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा काही उपाययोजना आखणार की नाही असा प्रश्न स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.







