| रायगड | प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 304 शाळा पटसंख्ये अभावी बंद पडल्या होत्या. या शाळांकडे कोणीही फिरकत नव्हते. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून या शाळांच्या डागडूजीसह रंगरंगोटी व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे. बंद पडलेल्या शाळांची केंद्र म्हणून निवड केली आहे. त्यामुळे या शाळा आता पुन्हा उघडल्या जाणार आहेत. रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत या शाळांच्या दुरुस्तीची कामे सुरु झाली आहेत.
जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजारहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 96 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील सहा वर्षापुर्वी शासनाने पटसंख्ये अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. पटसंख्ये अभावी जिल्ह्यातील 304 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या. या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत पाठविण्यात आले. त्यामुळे बंद पडलेल्या शाळा ओस पडल्या. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या किलबिलाटला ब्रेक लागला. शुकशुकाट निर्माण झाला. खिडक्या, दरवाजे खराब होऊ लागले. शाळेच्या परिसरात गवत वाढू लागले. भिंतीना तडे पडणे, भिंतीवरील रंग उडणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रदिर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 59 गटातील आणि पंचायत समितीच्या 118 गणांतील मतदार संघात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ठिकठिकाणी प्रचार वेगात सुरु आहे. येत्या 7 फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते साडेपाच यावेळेत मतदान असणार आहे. दोन हजार 323 मतदान केंद्रात मतदान होणार आहे. त्यामध्ये बंद पडलेल्या 304 शाळांचा देखील समावेश आहे. मतदान केंद्र सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कामाला लागले आहे. बंद पडलेल्या शाळांमधील परिसर स्वच्छ करण्याबरोबरच उभारण्यात येणाऱ्या मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य अशी तयारी सुरू केली आहे. या शाळांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम सुरु करण्यात आले आहे. बंद पडलेल्या या शाळा मतदानामुळे पुन्हा उघडल्या जाणार आहेत. परिसरात किलबिलाट असणार आहे. मात्र, तो किलबिलाट विद्यार्थ्यांचा नसून मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचा असणार आहे. अनेकांच्या हातात मतदान कार्ड असणार आहे. मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस असणार आहे. रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी केंद्रात येण्याची व्यवस्था असणार आहे.
मतदान केंद्र म्हणून बंद पडलेल्या शाळांचाही वापर केला जाणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार या शाळा पुन्हा दुरुस्त करण्याच्या सुचना आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे.
-पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी,प्राथमिक
रायगड जिल्हा परिषद
मतदान केंद्रासाठी बंद पडलेल्या शाळांची देखील निवड केली आहे. या शाळांची दुरुस्ती करण्याचे काम सुरु केले आहे. वीज, पाणी व अन्य व्यवस्था करण्यच्या सुचना करण्यात आल्या असून त्या पध्दतीने काम सुरु केले आहे.
-राहूल शेळके, उपअभियंता
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, अलिबाग






