| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम शेकापनेच मंजूर करून घेतले. दुर्दैवाने आमदारकी गेली आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय टक्केवारी घेणारे घेत आहेत. देवळाच्या कामाची देखील खोटी बिले काढून लुटमार केली जात आहे, असा आरोप शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. तसेच, ज्यांना मोठे केले ते खोटे निघाले. लुटमार करून खोटी बिले काढणाऱ्यांना घरी बसवा, असा इशारा देत मोहन धुमाळ व अंजली पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
काविर जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार मोहन धुमाळ व रामराज पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार अंजली पाटील यांच्या प्रचारार्थ रामराज बाजार पेठेत सोमवारी (दि.2 ) सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी उमेदवार मोहन धुमाळ, अंजली पाटील, शिवसेनेचे युवा नेते पिंट्या उर्फ अमिर ठाकूर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रिया वेटकोळी, मधुकर ढेबे, अशोक खोत, विक्रांत वार्डे, गंगाराम शेळके, उपकार खोत, अनंत पाटील, जयवंत तांबडकर, सुरेखा झावरे, आदी शेकाप, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष, महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.
यावेळी बोलताना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले, आजची ही सभा ऐतिहासिक सभा आहे. दिलेला उमेदवार सर्वधर्म समभाव जपणारा कार्यकर्ता आहे. म्हणूनच त्यांना माऊली संबोधले जाते. असे कार्यकर्ते असतील तर पक्ष नक्कीच पुढे जाईल. पक्षासोबत असणारे आणि सोडून जाणारे पुन्हा लालाबावट्याच्या झेंड्याखाली एकत्रित येत असल्याने शेतकरी कामगार पक्षाला गतवैभव प्राप्त होणार असल्याचे शुभ संकेत रामराज परिसरातील घडामोडींमुळे मिळाले आहेत. महिला आघाडीने या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. या निवडणुकीत महिला शक्ती शेकापच्या सोबत उभी असून आपला विजय निश्चित आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, शेकापने अलिबाग-रोहा रस्ता मंजूर करून आणला. या रस्त्याला 260 कोटींचा निधी आणला. मात्र, या रस्त्याचे उद्घाटन आणि नारळ फोडण्याचे श्रेय विरोधकांनी घेतले. विकासाच्या नावाखाली 20 टक्क्यांचे राजकारण सध्या सुरू आहे. रामराजच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच या परिसरातील जनता शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ज्या ठेकेदारांनी बोगस विकासकामे केली आहेत, त्या नेतृत्वधारी ठेकेदारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज राहा. शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून रामराज परिसरात आपले पक्षीय बळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले. याचाच प्रत्यय निवडणुकीच्या निकालामध्ये नेहमीच वरचढ असलेला पहावयास मिळाला आहे. हीच पक्षाबरोबर असणारी एकनिष्ठता कायम ठेवून खटाऱ्यासोबत राहा. येणारे चार दिवस आपल्या परीक्षेचे आहेत. आपल्या सहकार्याने आपला उमेदवार रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप-महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी पाठवा. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. त्यामुळे विकासात्मक दृष्टिकोन असणाऱ्या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
तसचे, सांबरकुंड मध्यम प्रकल्प उभारणी साठीचा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच शासन दरबारी मांडला आहे. सांबरकुंड धरणांमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर शेकाप आणि महाविकास आघाडी कायम राहणार आहे. खैरवाडी, जांभुळवाडी, सांबर डोहवाडी, महान आणि महानवाडी या गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार आहोत. पुनर्वसन होणाऱ्या गावांबरोबर धरणाच्या भिंती लगत असणाऱ्या महान आणि महानवाडी या गावचे पुनर्वसन आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी न्याय मागणार आहोत, असे शेकाप देखील शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले.
भोनंगमध्ये शिंदे गटात भगदाड
अलिबाग तालुक्यातील भोनंगमध्ये शिंदे गटात भगदाड पडले आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या कार्य प्रणालीवर खूश होऊन शिंदे गटातील चंद्रकांत शेळके यांच्यासह अनेकांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रामराज येथे प्रचार सभेच्या दरम्यान हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी चंद्रकांत शेळके यांंच्यासह नव निर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.













