जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 3, पंचायत समितीच्या 8 पैकी 7 जागांवर विजय
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीचे पानिपत झाल्याचे निकालावरून दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी सात जागादेखील जिंकून महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदारांनी अनुकूल कौल दिल्यामुळे तालुक्यात भाजपा महायुतीची पीछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी सात फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी 14 उमेदवार, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात उतरले होते. सोमवारी (दि.9) फेब्रुवारी रोजी उरण बोकडविरा येथील सिडकोच्या प्रशिक्षण इमारतीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेवर व पंचायत समितीवर बहुमत सिद्ध केले आहे.
यामध्ये जिल्हा परिषद नवघर 26 गटातून, महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा गटाच्या प्रेरणा कुणाल पाटील यांना 10617 मते मिळाली त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपा महायुतीच्या प्रभावती राजाराम भोईर यांना 6198 मते प्राप्त झाल्यामुळे त्यांचा 4,419 मतांनी पराभव झाला. तर नवघर पंचायत गण 51मध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परेश धनाजी ठाकूर यांना 4341 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपा महायुतीचे हरेश गंगाधर भोईर यांना 3968 मते मिळाल्यामुळे त्यांचा 337 मतांनी पराभव झाला. तर भेंडखळ पंचायत 52 गणातून महाविकास आघाडीचे शिवसेना उबठा गटाचे दीपक सुरेश भोईर यांना 4270 मते पडली. तर भारतीय जनता पार्टीचे मिलिंद काशिनाथ पाटील यांना 3136 मते प्राप्त झाली. त्यामुळे त्यांचा 1,134 मतांनी पराभव झाला. तर जासई गट 27 मधून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. मनीष अनंत पाटील यांना 10, 803 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे महायुतीचे जे.डी. जोशी यांना 8811 मते मिळाल्यामुळे त्यांचा 1992 मतांनी पराभव झाला. तर जासई पंचायत 53 गणातून महाविकास आघाडीच्या शेकापच्या निर्मला नरेश घरत यांना 4165 मते मिळाल्यामुळे त्या विजयी झाल्या आहेत. तर त्यांचे भाजपा महायुतीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीषा बळीराम घरत यांचा त्यांनी पराभव केला.
तसेच चिर्ले पंचायत 54 गणातून महाविकास आघाडीच्या शेकापच्या उमेदवार प्रियांका दीपक मढवी या 6241 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या ज्योत्सना अजित पाटील यांचा पराभव केला. तसेच जिल्हा परिषद गट क्रमांक 28 चाणजे मधून भाजपा महायुतीचे उमेदवार रीना जितेंद्र घरत यांना 10069 मते प्राप्त झाली. तर महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सिद्धी सागर कडू यांना 8437 मते मिळाल्यामुळे त्यांचा 1632 मतांनी निसटता पराभव झाला. तर पंचायत गण 55 केगाव मधून, महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार महेश महादेव म्हात्रे यांना 4035 मते प्राप्त झाल्यामुळे ते विजयी झाले. त्यांनी भाजपच्या राजेंद्र आत्माराम ठाकूर यांचा पराभव केला. तर चाणजे पंचायत गण क्रमांक 56 मधून भारतीय जनता पार्टीचे कैलास मोरेश्वर भोईर हे 4751 मतांनी निवडून आले. त्यांनी शेकापच्या अँड सागर सदानंद कडू यांचा पराभव केला. चिरनेर जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार अविनाश ठाकूर हे 14932 मतांनी निवडून आले. तर त्यांचे भाजपचे प्रतिस्पर्धी देवेंद्र विनायक पाटील यांना 11,169 मते मिळाल्यामुळे त्यांचा 3763 मतांनी पराभव झाला. चिरनेर पंचायत गणातून महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या कविता रुपेश पाटील यांना 8247 मते प्राप्त झाल्यामुळे त्याही विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार साक्षी सुजित पाटील यांना 5222 मते प्राप्त झाल्यामुळे त्यांचा पराभव झाला. आवरे पंचायत गणातून महाविकास आघाडीच्या शेकापच्या प्रारंभी अविनाश गावंड यांना 7414 मते प्राप्त झाल्यामुळे त्या विजयी झाल्या आहेत. शेकापमधून भाजपमध्ये जाऊन उमेदवारी लढविणाऱ्या उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा निलेश म्हात्रे यांचा पराभव केला. उरण तालुक्यात महाविकास आघाडीने जोरदार एन्ट्री घेतल्याने भाजपा महायुतीला बहुमतांनी हुलकावणी दिली आहे.





