रायगडमध्ये दशकभरात 289 गावांची भर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली डोंगर पोखरण्याचे प्रकार वाढत असून, त्याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. प्रशासनाकडून याकडे पुरेसे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांतील नागरिकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 392 गावांना दरडीचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी ही संख्या केवळ 103 इतकी होती. आता त्यात 289 गावांची भर पडल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.
या धोकादायक गावांमध्ये महाड आणि पोलादपूर तालुक्यांचा मोठा वाटा असून, या दोन तालुक्यांतील 200 हून अधिक गावे दरडप्रवण क्षेत्रात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रायगड हा प्रामुख्याने ग्रामीण जिल्हा असून, गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर डोंगर खोदकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाची परवानगी न घेता तर काही ठिकाणी मर्यादित परवानगी घेऊन त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रमाणात माती व खडीचे उत्खनन केले जात असल्याचे दिसून येते. या अनियंत्रित खोदकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने डोंगरांची स्थिरता धोक्यात आली आहे.
दरवर्षी प्रशासन दरडग्रस्त गावांची माहिती गोळा करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न करते. मात्र, डोंगर पोखरण्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्याने यापूर्वी अनेक भीषण दरडीच्या दुर्घटना अनुभवल्या आहेत. महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडी दुर्घटनांमध्ये 300 हून अधिक जणांचा बळी गेला होता. 2021 मध्ये महाड तालुक्यातील तळीये येथे झालेल्या दरड दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2023 मध्ये 19 ते 20 जुलैच्या मध्यरात्री इरसालवाडी येथे दरड कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, तर काही जण अद्यापही बेपत्ता राहिले. अशा घटनांमुळे जिल्ह्यात दरडीच्या दुर्घटनांची भीती अधिक वाढली आहे. दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. पावसाळा जवळ येत असताना ही चिंता अधिक तीव्र झाली आहे.
विकास की विनाश?
रायगडमध्ये पोलादपूरपासून पनवेलपर्यंत अनेक लहान-मोठे डोंगर परिसराच्या सौंदर्यात भर घालत होते. पावसाळा व हिवाळ्यात या डोंगर भागात फिरण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी होत असे. मात्र, सध्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर डोंगरांचे उत्खनन करून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
काही ठिकाणी डोंगर अक्षरशः पोकळ करण्यात आले असून, त्यामुळे जमिनीची पकड सैल झाली आहे. परिणामी, पावसाळ्यात अतिवृष्टीदरम्यान माती धूप होऊन दगड, झाडे व मातीचे ढिगारे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे “विकास की विनाश?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रशासन सज्ज, उपाययोजना सुरू
पावसाळा सुरू होण्यासाठी काहीच दिवस उरले असताना जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी सुरू केली आहे. वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
दरडप्रवण भागांचे सर्वेक्षण, तज्ञांचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर दिला जात असून, आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरडप्रवण गावांमध्ये उद्घोषणा प्रणाली
रायगड जिल्ह्यातील 392 दरडप्रवण गावांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्येवर्ग 1 मध्ये 18 गावे, वर्ग 2 71 मध्ये गावे, वर्ग 3 मध्ये 159 गावे आहेत. वर्ग 1 आणि 2 मधील 89 तसेच वर्ग 3 मधील 3 अशा एकूण 91 गावांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू करण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी या सर्व ठिकाणी हवामानाची पूर्वसूचना दिली जाणार आहे. धोका निर्माण झाल्यास सायरनद्वारे इशारा देण्यात येणार असून, ही प्रणाली गावांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
दरडग्रस्त गावांवर संख्येवर दृष्टीक्षेप
तालुके - गावांची संख्या
पोलादपूर - 139
महाड - 122
अलिबाग - 09
कर्जत - 05
खालापूर - 12
तळा - 03
पनवेल -03
पेण - 13
रोहा - 20
सुधागड - 09
म्हसळा - 14
श्रीवर्धन - 12
मुरूड - 09
माणगांव - 22
–
एकूण - 392




