| रायगड | प्रतिनिधी |
जून महिन्यापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे उर्वरीत काम पूर्ण होईल आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास निर्विघ्न होईल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता. पण महामार्गाचे काम जुलै महिना उजाडला तरी पूर्ण झाले नाही, अपुर्ण काम असलेल्या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था होण्यास सुरूवात झाली आहे. नागोठणे आणि गडब परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर पुलांची कामही अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या वर्षी हे काम पूर्ण होईल आणि कोकणवासियांचा प्रवास सुखकर होईल अशी
अपेक्षा होती. मात्र ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे याही वर्षी कोकणची वाट खडतरच असल्याचे चित्र सध्या महायला मिळत आहे. महामार्गावर नागोठणे जवळील कोलेटी येथे उड्डाण पूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांना सध्या सर्व्हिस मार्गांचा वापर करावा लागत आहे. या सर्व्हिस मार्गिकांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना खड्ड्यामधून आदळत आपटत पुढील मार्गक्रमण करावे लागत आहे. या ठिकाणच्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था आहे. खड्ड्यांमधील खडी बाहेर आली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या परिसरातून मार्गक्रमण करतांना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाणी साचलेल्या खड्ड्यामधून वाहने चालवतांना अंदाज येत नसल्याने वाहने आपटण्याचे प्रमाण वाढले आहे.
या परिसरातील उड्डाण पुलाचे काम हे मे अखेर पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. सद्यस्थिती लक्षात घेतली तर हे काम लवकर पूर्ण होण्याची चिन्हही दिसत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची वाट खडतरच राहण्याची चिन्ह आहेत. वडखळ येथून अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हीस मार्गिकेची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे.
पेव्हर ब्लॉक बसवून या मार्गाची मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र आता पेव्हर खचून ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे कठीण जात आहे. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गावर गडब परिसरातही महामार्गाची पुरती दुर्दशा झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण करून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता. पण पावसामुळे डांबरीकरण वाहून गेल्याने, रस्त्या मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला आहे. कोलेटी येथील पूलाचे काम गेली अनेक वर्ष अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडवरून वाहतूक वळविण्यात आली आहे. या सर्व्हिस रोड्सच्या देखभाल दुरुस्तीकडे महामार्ग प्राधिकरण अजिबात लक्ष्य देत नाही. त्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, येथे वाहने चालवणे मुष्कील झाले आहे.







