अनेक गावांचा संपर्क तुटला; संकटातही माणगावकरांनी जपली माणुसकी
| माणगाव | सलीम शेख |
निसर्गाच्या अविरत प्रकोपाने माणगाव तालुका अक्षरशः पुराच्या महाविळख्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काळ आणि गोद नदीने रौद्र रूप धारण केले असून, शहरासह ग्रामीण भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील रस्ते जलमय झाले असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिके वाहून गेली आहेत. तसेच, हजारो नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.
माणगाव तालुक्यातील सर्व धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून, प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या आठवड्यात तालुक्यात सुमारे 102 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने प्रशासनाने दोन दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भिरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली. महामार्गावरील वाहतूक सुरू असली, तरी अनेक अंतर्गत रस्ते बंद राहिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सलग 48 तास अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. पूराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भातशेतीसह विविध पिके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक भाग अंधारात बुडाले, तर पाणीपुरवठाही अनियमित झाला. बाजारपेठ बंद राहिल्याने व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
माणगाव शहरातील खांदाड, सिद्धी नगर, भादाव, बामणोली रोड, रेल्वे स्थानक, कचेरी रोड या परिसरात तब्बल आठ दिवस पुराचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अनेक कुटुंबांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. संसारोपयोगी साहित्य, धान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि घरातील मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या आयुष्यभराच्या कष्टावर एका रात्रीत पाणी फिरले. पुराच्या पाण्यामुळे बामणोली, मांगवली, निळगुण, रीळे, पाचोळे, नाणोरे यांसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने गावांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळित झाला. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने पाण्याची पातळी हळूहळू ओसरत असली तरी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत.
मात्र, या संपूर्ण संकटात माणगावकरांनी माणुसकीची उज्ज्वल परंपरा जिवंत ठेवली. पुरात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविणे, अन्न-पाणी उपलब्ध करून देणे, वृद्ध, महिला आणि लहान मुलांना मदत करणे, रात्रभर बचावकार्य करणे अशा अनेक प्रकारे नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खंबीरपणे उभी राहिली. संकट कितीही मोठे असले तरी माणुसकी त्याहून मोठी असते, हे माणगावने पुन्हा एकदा सिद्ध केले.
नागरिकांसाठी प्रशासनाचे आवाहन
माणगावकरांनी सतर्क राहावे, एकमेकांना मदतीचा हात द्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच, नदी, नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाऊ नका. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा, अशा सुचना देखील करण्यात आल्या आहेत. तसेच, आपत्कालीन मदतीसाठी पोलीस- 100, आपत्ती व्यवस्थापन- 112, राष्ट्रीय आपत्तीव्यवस्थापन- 9711077372 आणि रुग्णवाहिका- 108 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.







