। मुंबई । प्रतिनिधी ।
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; काही भागांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूरमध्ये पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सोमवारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. दरम्यान, मंगळवार आणि बुधवारी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.





