सर्दी, खोकला, अंगदुखीने रुग्ण त्रस्त; परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
| उरण | प्रतिनिधी |
सध्या पावसाळा सुरू असल्याने वातावरण बदलत आहे. अशातच ताप, डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे. सध्या दिवस गणित 200 रुग्ण उपचार करुन घेण्यासाठी ये-जा करत आहेत.
उरण तालुक्यातील नागरिकांनी पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी आप आपला परिसर स्वच्छ ठेऊन पिण्याचे पाणी गरम करून पिण्यासाठी वापरावे. तसेच लहान मुले किंवा नागरिक यांना आजाराची लक्षणे दिसून येताच त्यांनी आपल्या परिसरातील रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवावे असे आवाहन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बी. एम काळेल यांनी केले आहे. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी हिवताप, काविळ, डेंग्यू आणि इतर रुग्णांमध्ये वाढ झाली. ही वाढ ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांतही कायम राहिली आहे. ऑगस्टमध्ये हिवतापाचे दिवस गणित 200 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत.
जूनमध्ये हिवतापाचे 450 रुग्ण होते. जुलैमध्ये त्यांची संख्या 1 हजार 380 वर पोहोचली. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांत 1 हजार 142 रुग्णांची नोंद झाली. डेंग्यूचे रुग्ण जूनमध्ये 66, जुलैमध्ये हा आकडा वाढला असून, ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात खासगी, शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे डेंग्यूचे 247 होते. ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांत उरण तालुक्यात दिवस गणित उरण शहरात 200 ते तालुक्यात 700 रुग्ण हे सर्दी खोकला अंगदुखी, काविळ, ताप, डेंग्यू सह इतर आजारांवर उपचार करुन घेताना आढळून येत आहेत. यामध्ये लहान मुलांना वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला, ताप सारख्या इतर आजारांनी त्रस्त केले आहे.त्यामुळे सध्या उरण तालुक्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहेत.
उरण तालुक्यातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेऊन, पिण्याचे पाणी गरम करून पिण्यासाठी वापरावे तसेच आजारांची लक्षणे दिसून येताच रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार करुन घेण्यासाठी पुढे यावे.
डॉ बी. एम. काळेल
उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय
वैद्यकीय अधीक्षक







