। मुंबई । वृत्तसंस्था ।
पाकिस्तान दहशतवाद्यांची घुसखोरी आणि छुप्या हल्ल्यांच्या माध्यमातून भारताला सतत लक्ष्य करण्यापासून परावृत्त होत नसला तरी आपल्या नवीन धोरणात १०० वर्षांच्या शांततापूर्ण संबंधांची चर्चा करणार असल्याचे समोर आले आहे. नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात पाकिस्तानने पुढील १०० वर्षांसाठी भारतासोबत शांततापूर्ण संबंध, सामान्य व्यावसायिक आणि आर्थिक संबंध स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी या धोरणाचा मसुदा प्रसिद्ध करणार आहेत. या धोरणांतर्गत जम्मू-काश्मीरच्या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. भारतासोबत चर्चा सुरू असून आमचे संबंध शांततापूर्ण असतील, असे धोरणात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे पाकिस्तानचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा धोरण भारतासोबत शांतता शोधत आहे. पुढील १०० वर्षांसाठी कोणतेही शत्रुत्व न स्विकारता , तसेच काश्मीर प्रश्नाच्या अंतिम निराकरणाची वाट न पाहता व्यापार आणि आर्थिक संबंधांचे सामान्य होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.