। मुंबई । वृत्तसंस्था ।
लडाखमधील नियंत्रण रेषेवरील संघर्ष मिटवण्यासाठी भारत आणि चीनमदरम्यान सुरु असलेली लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची चौदावी फेरीही अयशस्वी ठरली. या बैठकीतून कोणताही सकारात्मक परिणाम झाला नसून वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांनी स्वीकारलेल्या उपायांवर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. चर्चेचा वेग कायम ठेवण्यासाठी पुढील फेरी लवकरच होणे अपेक्षित आहे.
दोन्ही देशांकडून याप्रकरणी प्रसिद्धीपत्रक काढलं जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये चर्चेची १३ वी फेरी पार पडली होती. तर ३१ जुलै रोजी बाराव्या फेरीची चर्चा झाली होती. दोन्ही देशाच्या परराष्ट्र नेत्यांची एससीओ शिखर बैठकीच्या निमित्ताने दुशान्बे येथे १६ सप्टेंबर रोजी भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही लष्करांनी गोग्रा भागात माघारीची प्रक्रिया पूर्ण केली होती. पूर्व लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही फेरी महत्त्वाची ठरली होती. मात्र या चर्चेत चीनला माघार घेण्यापासून प्रवृत्त करण्यास भारताला अपयश आलं.