बदल्यांसाठी याद्या पाठवायचे; सीताराम कुंटेंचा गौप्यस्फोट
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यातील पोलीस बदल्यांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख आपले खासगी सचिव संजीव पालंडे यांच्यामार्फत अनधिकृत याद्या पाठवायचे, असा आरोप राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केला आहे. सात डिसेंबर रोजी ईडीसमोर झालेल्या चौकशीदरम्यान कुंटे यांनी हा जबाब नोंदविला आहे. या आरोपामुळे खळबळ माजली असून, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवायचे. ते आपले खासगी सचिव संजीव पालंडे यांच्यामार्फत ही यादी पाठवायचे. ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकार्यांमार्फत मिळायची. मी त्यांच्या अंतर्गत येणार्या विभागात काम करत असल्याने मी या यादीला नकार देऊ शकत नव्हतो. देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत बदलीची यादी पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या सर्व सदस्यांना दाखवली जायची. या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठवल्याचं तोंडी सांगितलं जायचं. यानंतर ही यादी अंतिम आदेशात समाविष्ट केली जायची, असे सिताराम कुंटे यांनी सांगितले.
देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने यादीला नाकारत नसल्याचे कुंटे यांनी म्हटल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुख सध्या100 कोटी वसुली प्रकरणात तुरुंगात आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर देखील सुनावणी सुरु आहे. देशमुख वेळोवेळी त्यांच्या माणासांकडून अनधिकृत यादी पाठवायचे. त्यांच्या अधीन काम करत असल्याने ती यादी नाकारु शकत नव्हतो. त्यातील काही नावे अंतिम यादीत असायची, असे कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा दावा केला होता. यापत्रानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनं कारवाई सुरु केली होती. अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत.