उपस्थित ग्रामस्थ गहिवरले
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शनिवारी (ता.29) या मार्गावरील जांभूळपाडा अंबा नदीवरील जुना पूल तोडण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले तर काहीजण गहिवरले देखील. 1989 च्या महाभयंकर पुरामध्ये देखील हा पूल खंबीर उभा राहिला होता. गेली 67 वर्षे पाली खोपोली या शहरांना व असंख्य गाव आणि लोकांना जोडणारा हा पूल तुटत आहे हे पाहून अनेकजण गहिवरले तर नवीन पुलामुळे वाहतूक सुरळीत होऊन पावसाळ्यात पुलावरून पाणी जाऊन होणारी गैरसोय आता संपणार आहे हे पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. ग्रामस्थांनी या पुलाशी निगडित त्यांच्या आठवणी यावेळी सांगितल्या.
विलास गलबले म्हणाले की गणपती विसर्जनावेळी या पुलावरून नदीत उड्या मारून पहायचो. आता याजागी उंच मोठे पूल होत असल्याने तसे करणे शक्य नाही. तर वैभव शिंदे यांनी सांगितले की या पुलाने 67 वर्षे आम्हाला अविरत सेवा दिली. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी जायचे आणि दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागायच्या लहानपणी या रांगा बघायला आम्हाला मज्जा यायची. त्याबरोबर आम्हाला शाळेला सुट्टी दिली जायची तो आंनद वेगळाच होता. आता इथे नवीन पूल झाल्याने वाहनांच्या रांगा लागणार नाहीत आणि शाळेला देखील सुट्टी मिळणार नाही. ही बाब चांगली आहे. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांना गंमत येणार नाही. असे शिंदे म्हणाले.