। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2021 मध्ये मुदत संपलेल्या व डिसेंबर 2021 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील 260 ग्रामपंचायतींत प्रभाग रचनेचा कार्यक्रम घेतला जाणार असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे, प्रभाग रचना अंतिम करणे अशी तालुका, उपविभागीय व जिल्हास्तरावर प्रक्रिया चालणार आहे. 9 मेपासून ते 5 जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. दरम्यान तहसीलदारांनी गावाचे नकाशे अंतिम करणे, तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे. सीमा निश्चित करणे, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे, प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन तहसीलदार यांनी हरकती व सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करणे, प्राप्त हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे, त्यानंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव सादर करणे आदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
1 जुलै रोजी उपविभागीय अधिकार्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम करणे आणि राज्य निवडणूक आयोगाला ते सादर करणे. पाच जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी व्यापक प्रसिद्धी देणे, असा कार्यक्रम होणार आहे.
चौकट
अतिरिक्त कामाचा भार
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यात आला आहे. त्यामुळे गावातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासक बसल्याने संबंधित अधिकार्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. आता लवकरच ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभागाने मुदत संपलेल्या व मुदत संपणार्या तसेच नव्याने प्रस्थापित होणार्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.