। अहमदनगर । प्रतिनिधी ।
बळीराजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी बुधवारी 1 जूनपासून पुणतांब्यातील शेतकर्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात पुढील पाच दिवस धरणे आंदोलन सुरु केले आहे. मागण्या महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण झाल्या नाहीत, तर हे आंदोलन आणखी तीव्र करू अशा इशारा पुणतांब्यातील शेतकर्यांनी दिला आहे. सकाळी बळीराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. देशभरातील विविध शेतकरी संघटनांचे नेते देखील या आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे येत्या काळात या आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता असून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी देखील वाढणार आहेत.
दुधाचे भाव, शेतातील शिल्लक ऊस, कांद्याचे भाव आणि पिकांना हमीभाव अशा विविध मागण्या घेऊन शेतकर्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात पुणतांब्यातील शेतकर्यांनी ग्रामसभा आयोजित करून एकूण 16 ठराव मंजूर केले होते. याबाबतच निवेदन सरकारला पाठवलं होतं. संबंधित निवेदनावर सात दिवसांच्या आत निर्णय न घेतल्यास 1 जूनपासून धरणे आंदोलन केलं जाईल, अशा इशाराही शेतकर्यांनी दिला होता. त्याप्रमाणे पुणतांब्यातील शेतकर्यांनी आजपासून पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. 1 ते 5 जूनदरम्यान पाच दिवस हे धरणे आंदोलन केलं जाणार आहे, त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, तर 5 जूननंतर आंदोलन अधिक तीव्र करू असंही शेतकर्यांनी म्हटलं आहे.