। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात वरुणराजा उशिराने दाखल झाला. त्यातच अनेक तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. विविध तालुक्यात पावसाचे असमान वितरण पहायला मिळत आहे. परिणामी अत्यल्प पाऊस झालेल्या तालुक्यातील तयार झालेली भात रोपे संकटात सापडली आहेत.
जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 16 तालुके मिळून सोमवार (ता.26) पर्यंत सरासरी 222.34 मिमी पाऊस झाला आहे. त्यामध्ये सर्वात कमी सुधागड 124.24 मिमी, त्यानंतर पोलादपूर 124.70 मिमी, रोहा 128 मिमी, पनवेल 129.80, मिमी, उरण 144 मिमी, माणगाव 152 मिमी, महाड 154 मिमी, पेण 157 मिमी, कर्जत 158.50 तर सर्वाधिक पाऊस श्रीवर्धन 572.00 मिमी, अलिबाग 336.00 मिमी, माथेरान 330.10 मिमी, मुरुड 319.00 मिमी, खालापूर 266.00 मिमी, म्हसळा 264.00 मिमी, तळा 201.00 मिमी या तालुक्यांचा समावेश आहे. मागील वर्षी 26 जून पर्यंत जिल्ह्यात सरासरी 941.56 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी 26 जून पर्यंत अवघ्या 222.34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी मागील वर्षीच्या पावसाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात तफावत पहायला मिळत आहे. ज्या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे तेथील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
पावसाअभावी भात रोपांची वाढ खुंटू नये यासाठी रोपवाटिकांना पर्यायी पाण्याची किंवा सिंचनाची व्यवस्था करावी. तसेच ज्या ठिकाणी सिंचन सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी रोपवाटिकांना झारीने दिवसातून किमान एकदा पाणी द्यावे. पाऊस सुरू होताच रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी शिफारशीनुसार खत मात्र देण्यात यावी,असा सल्ला कृषी उपसंचालक दत्तात्रेय काळभोर यानी दिला आहे.
शेतकर्यांनी योग्य प्रमाणात पाऊस पडल्यावर रोहू पद्धतीने बियाणे पेरावे. हळव्या किंवा कमी कालावधीच्या बियाण्यांचा वापर करावा.
उज्वला बाणखेले, कृषी अधीक्षक
आत्तापर्यंत पाऊस खूप कमी पडला आहे. मात्र पडलेल्या पावसावर भाताची रुजवन चांगली झाली आहे. रोपेसुद्धा मोठी झालीत. मात्र पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने चिंता वाटत आहे.
मालू कोकरे, शेतकरी, सुधागड