। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अर्थात ङ्गइडीफ सरकारमध्ये पहिल्या विस्तारामध्ये एकाही महिलेला स्थान दिले नसल्याने महिला मतदारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे तसेच युवती जिल्हाध्यक्षा अॅड. सायली दळवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 50 टक्के मतदार असतानाही महिलांना संधी न देणार्या महिलाद्वेषी सरकारला महिला मतदार भविष्यातील निवडणूकीत मतपेटीतून नाराजी दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारच्या 18 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. मात्र 18 जणांमध्ये एकाही महिला आमदारांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे या सरकारची महिलांबद्दलची मानसिकता समोर आली आहे. शिवरायांच्या रायगडमध्ये महिला पालकमंत्री दिल्याने नाराजी व्यक्त करणार्या बंडखोर आमदारांच्या पाठबळावर सत्तेवर आलेल्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार, असे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, महिलेच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचे आरोप झाल्याने महाविकास आघाडी सरकारमधून राजीनामा घेतलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा या सरकारमध्ये मंत्री करण्यात आल्याने महिलांच्या बाबतीत या सरकारची काय भूमिका असणार, हे स्पष्ट झाले असल्याचे बोलले जात आहे.
रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत बोलताना बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी तर शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात एका महिला आमदाराला पालकमंत्री केल्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. आज पुन्हा एकदा या सरकारमध्ये एकाही महिला आमदारांना संधी न मिळाल्याने सरकारचे महिलांबद्दलचे मत अधोरेखित झाले आहे.
आज सत्तांतर होऊन एक महिना होऊन का होईना पण मुहूर्त लागला. पहिल्या टप्प्यात 18 मंत्री झाले. पण दुर्दैव असे की, यात एकही महिला नाही. आज राज्यात जवळजवळ 50 टक्के महिला मतदार आहेत. असे असतानाही पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात समतेची भाषा असते तिथे एकाही महिलेला मंत्रीमंडळात स्थान दिलेले नाही ही दुर्दैवीच बाब आहे.
उमा मुंढे, महिला जिल्हा अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महिला अग्रेसर राहिल्या आहेत. असे असतानाही महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये ज्या आमदारांना निवडून आणण्यामध्ये महिला मतदारांचा 50 टक्के वाटा आहे. त्या महिलांनाचा डावलण्यात आले आहे. महिला आमदारदेखील राज्याचे नेतृत्व करण्यात सक्षम आहेत, असे असतानाही या सरकारमध्ये महिलांना एकही मंत्रीपद न मिळणे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादी तर्फे अदिती तटकरे यांना संधी मिळून त्यांनी कमी वेळात चांगल्या पद्धतीने मंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री म्हणून काम केले. या सरकारने महिलांना मंत्रीपद न देऊन एक प्रकारचा अपमानच केला आहे. त्या अपमानाचे उत्तर महिला पुढील निवडणूकीत मतदानाच्या माध्यमातून देतील.
अॅड. सायली दळवी, युवती जिल्हा अध्यक्षा