महामार्गावरील शंभर टक्के खड्डे भरण्याचे निर्देश
बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली पाहणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्तेदुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि.26) दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर रस्त्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आ. भरत गोगावले, पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
चव्हाण यांनी पनवेल येथून दौर्याची सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील या पाहणी दौर्यात त्यांनी कासू, नागोठणे, वाकण फाटा, खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदी ठिकाणी जाऊन रस्त्याच्या सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागातील अनेक परिसरांमध्ये पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. काही ठिकाणी खड्डे युद्धपातळीवर बुजविण्याच्या दृष्टीने रेडीमिक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने रस्त्यांमधील खड्डे बुजवतात, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.
कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करण्याचे सक्त आदेश मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित विभाग व कंत्राटदारास दिले. तसेच गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यास रस्त्यावरून प्रवास करताना त्रास होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी आणि रस्ता दुरुस्ती, रस्ता जोडणे, पेव्हर ब्लॉक टाकणे आदि संबंधित कामे तातडीने संपवावीत, असेही सांगितले.
रस्ता दुरुस्ती संदर्भात कोणतेही कारण न सांगता रस्ता दुरुस्ती तातडीने आणि प्राधान्याने व्हायलाच हवी. जेणेकरून कोकणात येणार्या गणेशभक्तांना त्रास होणार नाही यासाठी कामास गती द्यावी. वेगवेगळे कंत्राटदार नेमून त्यांच्यामार्फत ही दुरुस्ती सुरु आहे. केवळ गणेशोत्सव नव्हे तर, त्यापुढेही काही काळ रस्ते चांगले राहतील, अशी दुरुस्ती करण्याचे त्यांनी संबंधितास सांगितले. याशिवाय महामार्गाचे राहिलेले काम पावसाळा संपताच तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे, असेही निर्देश संबंधित विभागाला श्री. चव्हाण यांनी दिले.
त्याचप्रमाणे रस्त्यावर अडथळा होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस विभागाने काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी जिल्हा पोलीस विभागाला केली.
मुंबई-गोवा महामार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु, यासंदर्भात काही प्रकरणे कोर्टात असल्यामुळे कामाच्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण होत आहे. तरीही, येत्या डिसेंबरअखेरपर्यंत या मार्गातील सर्व अडचणी दूर करुन संपूर्ण महामार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण होईल.
– रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री