दलदलीतून मार्गक्रमण करीत गाठावी लागतेय शाळा
स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
देशाचा अमृतमहोत्सव नुकताच देशवासियांनी मोठ्या उत्साहात ‘घर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत ध्वज फडकावून साजरा केला. परंतु, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आदिवासी वाड्या-वस्त्यांवर साधा रस्ता झाला नाही. आजही चिरनेरसारख्या ऐतिहासिक गावातील आदिवासी वाड्यांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दलदलीच्या रस्त्यातून चिखल तुडवीत शाळा गाठावी लागत आहे, ही शोकांतिका आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
इंग्रजांविरुद्ध 1930 साली चिरनेर परिसरातील जनतेने आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढा उभारला होता. चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या लढ्यात आठ शूरवीरांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. या लढ्यात नाग्या महादू कातकरी हा कातकरी आदिवासी तरुण हुतात्मा झाला होता. मात्र, त्याच्या वारसांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही राहायला घर नाही की पिण्यास पाणी नाही, तसेच गावांना जोडणारा रस्ता नाही. त्यामुळे त्यांच्या नशिबात आजही संघर्ष करावा लागत आहे.
चिरनेर ग्रामपंचायत हद्दीमधील केळाचा माळ व चांदायणी आदिवासीवाडीवर कातकरी समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र, चिरनेर ग्रामपंचायतीच्या उदासीन व दुर्लक्षित कारभारामुळे या आदिवासी वाड्यांपर्यंत अजूनही पक्का रस्ता होऊ शकला नाही की येथील आदिवासी बांधवांना शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध झाला नाही. परिणामी, या आदिवासी बांधवांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दगड मातीच्या रस्त्यातून चिखलाची दलदल तुडवीत रोज सुमारे तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कष्टमय झाले आहे, अशी संतप्त भावना आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत.
13 लाखांचा निधी मंजूर
चिरनेर गाव ते केळाचा माळ आदिवासी वाडीपर्यंतच्या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडून सुमारे 13 लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, चिरनेर ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे या रस्त्याचे काम होऊ शकले नाही. याबाबत आदिवासी समाजाने वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. या आदिवासींच्या प्रगतीला खीळ घालणार्या चिरनेर ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात आदिवासी समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच स्थानिक आमदारांनी लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी या आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत.
गावात पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. अनेकदा तक्रारी करुनही वाडीपर्यंत पक्का रस्ता नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण घेण्यासाठी चिखल तुडवत पायपीट करावी लागत आहे.
– सुरेश कातकरी, केळाचा माळ आदिवासी वाडी
केळाचा माळ आदिवासीवाडी रस्त्यासाठी जि.प.चा निधी मंजूर झाला होता; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. सध्या येथील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. तरी, लवकरच रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
– महेश पवार, ग्रामविकास अधिकारी