| उरण । वार्ताहर ।
नवी मुंबईला पाणी पुरवठा करणार्या हेटवणे जलववाहिनीला गळती लागल्याने शुक्रवारपासून तीन दिवस खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह उरण-पनवेलमधील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यादरम्यान जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती हेटवणे पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे या जलवाहीनीवर अवलंबून असलेल्या परिसरातील नागरिकांना आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिडकोच्या हेटवणे धरणातून खारघर, तळोजा, उलवे आणि द्रोणागिरी तसेच उरण-पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीना व वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो. शुक्रवारी रात्री मुख्य जलवाहिनीला हेटवणे धरणानजीक सापोली गावाजवळ गळती लागली होती. त्यामुळे लाखोलीटर पाणी वाया गेले. गळती झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र जलवाहिनी दुरुस्तीच्या कामानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू झाला असला तरी तो नियमित होण्यासाठी पुढील दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.हेटवणे धरणाच्या जलवाहिनीला लागलेली गळती बंद झाली आहे. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाने पाणी पुरवठा सुरू केला आहे.
दुरुस्ती नंतर जास्त दाबाने पाणी पुरवठा न करता सध्या कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू असल्याने नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत.
– प्रीतेश ठाकूर, सहाय्यक अभियंता,हेटवणे पाणी पुरवठा विभाग
टँकरने पाणी पुरवठा
जेएनपीटी कामगार वसाहतीत 40 लाख लिटर पाणी साठ्याची क्षमता आहे. मात्र मागील चार दिवस हेटवणे धरणातून पाणी पुरवठा न झाल्याने येथील नागरिकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.