अंकुर ट्रस्ट, आदिवासी विकास प्रकल्प पेणचा पुढाकार; वाड्यावाड्यांवर अनौपचारिक शिक्षण केंद्रे सुरू
| पेण | प्रतिनिधी |
कोरोना काळात शाळेत जाऊ न शकलेल्या आदिवासी मुलींच्या आयुष्यात पुन्हा ‘अंकुर’ रुजविण्याचे काम आदिवासी विकास प्रकल्प पेण व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. शाळाबाह्य आदिवासी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पेण तालुक्यातील 20 हून अधिक आदिवासी वाड्यांवर अनौपचारिक शिक्षण केंद्र सुरु करण्यात आली असून, याठिकाणी शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.
‘विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले॥ वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥‘ हा महात्मा फुले यांचा संदेश म्हणजे क्रांतिकारक तर आहेच; पण एक नवीन तत्त्वज्ञान मांडणारा आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. त्या आदिवासी विकास प्रकल्प पेण व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना काळात शाळेत न जाऊ शकलेल्या आदिवासी मुलींच्या प्रशिक्षण शिबिरात बोलत होत्या.
कोरोना ह्या जागतिक संकटामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोना काळात संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडून पडली, शिक्षणात आलेल्या या व्यत्ययाने मुलांना शिक्षण हक्कापासून वंचित राहावे लागले. यात बहुसंख्य कष्टकरी, गरीब वर्गातील मुले, भटके विमुक्त अदिवासी ग्रामीण भागांतील सरकारी किंवा अनुदानित शाळेत जाणार्या मुला-मुलींचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आदिवासी वाड्या या गावापासून दूर अंतरावर असल्याने शाळेसाठी मुलांची दररोज पायपीट होत असे; परंतु शिक्षणाचा उत्साह मात्र कायम होता. कोरोना काळात शिक्षणात अंतर पडल्याने आदिवासी मुले डोंगरात आपल्या वाड्यांवर राहिली, त्यामुळे गळतीचे प्रमाण वाढले. मुलांचा शिक्षणातील रस कमी होऊ लागला. कोरोना काळात शिक्षण बंद न करता शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्येवर नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली.
या अशा शाळाबाह्य झालेल्या आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ‘अंकुर’ व ‘आदिवासी विकास प्रकल्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळाबाह्य आदिवासी मुलांकरिता ‘अनौपचारिक शिक्षण केंद्र’ सुरु करण्यात आले. ही अभ्यास केंद्र पेण तालुक्यातील 20 वाड्यांवर सुरु करण्यात आली. यात विविध वाड्यांवर शाळाबाह्य आदिवासी मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळेचा माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षण घेणे का गरजेचे आहे, हे दृकश्राव्य माध्यमातून गौरी दळवी या अंकुर ट्रस्टच्या कार्यकर्तीने आपल्या सत्रात समजावून सांगितले. यावेळेस अभ्यास केंद्र चालविण्यास मदत करणार्या मीनल सांडे, प्रतीक्षा पावले, श्वेता देसाई उपस्थित होत्या.