| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात थोडेथोडके नव्हे तर सुमारे एक कोटी बत्तीस लाख इतके ज्येष्ठ नागरिक आहेत. शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठांना सरकार निवृत्तीवेतन देत असते. तसेच शक्य असतील त्या इतरही सवलती सरकारकडून अधून मधून त्यांना दिल्या जात असतात.काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एस.टी भाड्या- मध्ये पन्नास टक्के सवलत सुरु केली तर वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात सर्व प्रकार च्या एस.टी.बसेसमधून मोफत प्रवास योजना कार्यान्वित केली.ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे. परंतु गरजेनुसार ज्येष्ठांसाठी आणखी काही सोयी सुविधा करणे शक्य असूनदेखील एस.टी.महामंडळ त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे असे दिसून आले आहे.
एस.टी.बस स्थानकाच्या आवारात गर्दीच्या मोसमात रिझर्वेशनच्या रांगेत तासन्तास उभे राहणे ज्येष्ठांना वयोमानानुसार शक्य नसते.करिता प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन खिडकीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असावी आणि तसा फलक रिझर्वेशन खिडकीबाहेर लावण्यात यावा अशी एक साधी सोपी आणि बिनखर्चाची सूचना काही महिन्यांपूर्वीच वृत्तपत्रांच्या माध्यमातून करण्यात आली होती.तसेच त्याच्या पाठपुराव्यासाठी एस.टी च्या काही उच्च स्तरीय अधिका-यांच्या समक्ष भेटीची घेण्यात आल्या होत्या.परंतु या अगदी किरकोळ,रास्त आणि बिनखर्चाच्या मागणीलाही अद्यापपर्यंत एस.टी.प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसते.कारण अशा प्रकारचा कोणताही आदेश बस स्थानक अधिका-यांना देण्यात आल्याचे दिसत नाही ही अत्यंत खेदाची आणि ज्येष्ठांवर अन्याय करणारी गोष्ट आहे.तरी एस.टी प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.