नवी दिल्ली | प्रतिनिधी |
महाराष्ट्र भाजपचे बडे नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्ली भेटीवर आहेत.त्यामुळे राज्यात मात्र आता नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली. यानंतर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर दिल्ली भेटीवर असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रात प्रथमच महाराष्ट्राला अधिक मंत्रिपदं मिळाली आहेत. या पार्श्वभूमीवर आपण राज्यातील मंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्लीला आलो आहे. तसंच मंत्र्यांची खाती आपण समजून घेतली. याचा राज्याला फायदा होईल. आपल्या दिल्ली दौर्यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही, असं ते म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा फक्त मीडियातच आहेत. पक्षात अशी कुठलीही चर्चा आणि विचार नाही. भाजपमध्ये दर तीन वर्षांनी बदल होत असतात. तळागाळापासून सेत अध्यक्षांपर्यंत बदल होत असतो. काँग्रेसला एक वर्षापासून पक्षाध्यक्ष मिळालेला नाही. भाजपमध्ये असं काही नाही. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही. या निव्वळ चर्चा आहेत, त्यात कुठलंही तथ्य नाही.
चंद्रकांत पाटील,भाजप प्रदेशाध्यक्ष
बावनकुळे प्रदेशाध्यक्ष?
महाराष्ट्र भाजपमध्ये बदल होण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यातच आता माजी ऊर्जामंत्री आणि विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होतील, अशी चर्चा आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे.