| अलिबाग | प्रतिनिधी |
जागतिक जल दिन 22 मार्चचे औचित्य साधून जल जीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण झालेल्या गावांनी ‘हर घर जल’ची घोषणा तसेच हागणदारी मुक्त अधिक (ओडिफ प्लस) निकषाची पूर्तता केलेल्या गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव हर घर जल व हागणदारी मुक्त घोषित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
दि. 22 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने सर्व ग्रामपंचायतीमध्ये एफआयके किटद्वारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी व परिसर स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता करणे, ग्रामपंचायत स्तरावर महिला बचत गट व ग्रामस्थांना घेऊन पाणी बचत, घरोघरी नळ जोडणी, पाणीपट्टी वसुलीसाठी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करून पाणी व स्वच्छतेबाबत सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले केले आहे.