मागणी वाढताच विक्रेतेही वाढले
पनवेल | विशेष प्रतिनिधी |
उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागताच नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बाटलीबंद पाणी विक्री करणारे विक्रेते सरसावले आहेत. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून कोणतीही प्रक्रिया न करता बोअरवेलच्या पाण्याने भरलेल्या जाराची विक्री केली जात असल्याचे प्रकार पनवेल परिसरात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे बोअरवेलद्वारे प्रचंड प्रमाणात भुजल साठ्याचा उपसा केला जात असतानाही सुरु असलेल्या या प्रकारावर वचक कोणाचा असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पनवेल पालिका हद्दीतील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक सध्या अपुर्या पाणी पुरवठ्याचा सामना करत आहेत.पाणीपुरवठा विभागाकडून अपुर्या प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बाटलीबंद पाणी खरेदीला पसंती देत आहेत. बाटलीबंद पाण्याला मागणी वाढल्याने मागणी नुसार पाण्याची गरज भगवण्यासाठी शहरातील अनेक भागात अपुर्या जागेत बोअरवेलचे पाणी शुद्ध करण्यासाठी आरो मशीन बसवण्यात आल्या आहेत. आरो मशीनद्वारे बोअरवेलचे पाणी शुद्ध केले जात असल्याचा दावा करून इतर कोणतीही प्रक्रिया न करता बाजारात 20 ते 40 रुपयांना वीस लिटर या दराप्रमाणे विकण्यात येत आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता लक्षात घेता अशा प्रकारे पाणी विक्रीकरणार्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.
.
कंटेनरमध्ये पाण्याची फॅक्टरी
मुब्रा – पनवेल महामार्गावरील कळंबोली या ठिकाणी असलेल्या काळभैरव मंदिराशेजारी असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर एका लोखंडी कंटेनर मध्ये वीस लिटर जारचा कारखाना सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी उघड्यावरच जुने प्लास्टिक जार पावडरच्या सहाय्याने स्वच्छ करून बोअरवेल च्या पाण्याने भरले जात असून, अत्यंत अपुर्या आणि अस्वछ वातावरणात सुरु असलेल्या या कारखान्यावर नियंत्रण कोणाचे असा सवाल उपस्थित होत आहे.
विक्रेत्यांकडून उडवा उडवी
कळंबोली परिसरातील या बाटलीबंद पाणी विकणार्या कारखानदाराकडे पाणी विक्री करण्या बद्दल असणार्या परवानगी बद्दल माहिती विचारली असता विक्रेत्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.