शेतात माती, पीक गेले वाहून
| पाताळगंगा | वार्ताहर |
गेले अनेक दिवस पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाले आहे.त्यामुळे भातलागवडीची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, आसरे-जांभिवली येथील वाकी नदीच्या किनारी बांधलेल्या संरक्षण भिंतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या संरक्षण भिंतीमुळे पावसाळ्यात मोठे नुकसान होत असल्याची ही बाब प्रशासनास निदर्शनास दिली होती. शिवाय, ही भिंत पाडण्यासाठी उपोषणचे हत्यारही उपसण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांच्या माध्यमातून अनेक आंदोलन करण्यात आली. या भिंतीमुळे मोठे नुकसान होणार असे सुचविण्यात आले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. शेतामध्ये मातीबरोबर शेतातील राब पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.







