लतादीदींच्या निधन वार्तेने सारा देश शोकाकुल झाला आहे. त्यांच्या गाण्यांनी अनेकांना समृद्ध केलंय. तर, कोणाच्या आयुष्याचा अखंड तुकडाच त्यांच्यात गुंतलाय. लतादीदींच्या आवाजाने भल्याभल्यांना मोहिनी घातली. प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी त्यांचा उल्लेख करताना म्हटले होते की, आकाशात सूर्य आहे. चंद्र आहे आणि त्यानंतर फक्त लताचा स्वर आहे. वि.स. खांडेकरांनी कितीतरी वर्षांपूर्वी ‘लता, छे कल्पलता!’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. तर, सुप्रसिद्ध कवी ग्रेसांनी ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये लतादीदींवर एक मोहक कविता लिहिली.
शांताबाईंने केले ‘लता’ पुस्तक
लता मंगेशकर यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर शांता शेळके यांनी ‘लता’ या पुस्तकाचे संकलन केले. हे पुस्तक मंगेशकर ट्रस्टने प्रकाशित केले. त्यात नौशाद, आशा भोसले, प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगुळकर, वि. वा. शिरवाडकर, पंकज मलिक, भालजी पेंढारकर, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, कुमार गंधर्व, सचिनदेव बर्मन, हृदयनाथ मंगेशकर, मजरुह सुलतानपुरी, रामूभैया दाते यांचे लेख आहेत. या मान्यवरांनी पुस्तकात आपल्याला माहित नसणार्या लतादीदींचे किस्से, अनुभव सांगितलेत.
उषा मंगेशकर म्हणतात
‘लता’ या पुस्तकात उषा मंगेशकर म्हणतात की, ‘लता आमच्याकडे एकटी कमावणारी होती. 14 वर्षांची आणि आम्ही आठ जण खाणारे होतो. त्यामुळे त्या काळात अगदी एक परकर पोलकं नेसून लता आठ महिने राहायची. आपल्या भावडांची म्हणजेच हृदयनाथ आणि उषा यांचे लाड करावे असं तिला वाटायचं. त्यांना चांगली कपडे घेऊन द्यावेत, पण ते शक्य नव्हतं. मग तिने एक दिवस मास्टर विनायक यांच्याकडून दोन ड्रेसेस मागून घेऊन आणले. चित्रपटात वापरण्यात येणार्या आणि अंगाने मोठे असलेले ड्रेसेस घालून हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर वावरू लागली.’
बडे गुलाम अली म्हणाले
हृदयनाथ मंगेशकर ‘लता’ पुस्तकातील लेखात म्हणतात की, ‘जेव्हा एक खासगी मैफल चालू असताना रेडिओ लागला आणि लताचं गाणं लागलं तेव्हा बडे गुलाम अली म्हणाले की, ‘याला म्हणतात आवाज आणि आणि ती मैफल तिथेच बंद केली.’ लता मंगेशकर यांच्या सुरांनी कवी ग्रेसांनाही मोहिनी घातली होती. त्यांनी लता दीदींवर ‘लता मंगेशकर’ या नावाने एक कविता लिहिली. ती कविता त्यांच्या ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ या कवितासंग्रहात आहे. त्या कवितेत ग्रेस म्हणतात-
माहेराहून गलबत आले
मला सखीचे स्वप्न जडे
हृदयामधल्या गुपितामध्ये
निशिगंधाचे फूल पडे.
अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे
शब्द परतले घरोघरी
जड बंधाच्या मिठीत रुसली
चैतन्याची खुळी परी.
या वाटेवर रघुपती आहे
त्या वाटेवर असे शिळा
सांग साजणी कुठे ठेवू मी
तुझा उमलता गळा?