| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ही मोकाट गुरे दिवसा जवळच असलेल्या जंगलात जातात व सायंकाळी आसरा म्हणून रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. त्यामुळे रस्त्यात बसलेली गुरे रात्रीच्या अंधारात दिसत नसल्याने अनेक वेळा वाहनांमुळे गुरे जखमी होत असतात. त्यात अनेक गुरे दगावत असून काही वाहनचालक देखील जखमी होताना दिसत आहेत. अशातच आंबेवाडी बाजारपेठेत शनिवारी (दि.8) रात्रीच्या सुमारास एका वाहनाने गाईला जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गाईचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे उनाड गुराचा बंदोबस्त करून त्यावर संबंधितांकडून उपाययोजना करण्यात यावी, असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.