शेकापचे नेते जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुरुडमध्ये मुस्लीम समाजाचा निर्धार मेळावा रविवारी (दि. 28) रोजी आयोजित करण्यात आला होता. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी अनंत गीतेंना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार असंख्य मुस्लीम समाजाने केला. मुस्लीम समुदायांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी व त्यांच्या भागातील प्रत्येक विकास कामांसाठी भरपूर योगदान दिले जाईल अशी ग्वाही यावेळी आ. जयंत पाटील यांनी दिली.
भाजपकडून वारंवार मुस्लीम समाजाचा अपमान केला जात आहे. घटनेने दिलेले अधिकार समाप्त करण्याची भाषा केली जात आहे. सुनील तटकरे भाजपबरोबर जाऊन निवडणूक लढवित असल्याने त्यांच्याबद्दल मुस्लीम समाजात खूप नाराजी आहे. ईडीच्या भितीबरोबरच स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी भाजपबरोबर गेल्याने त्यांच्याबद्दल तीव्र संताप आहे. त्यांनी मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तटकरे केवळ विकास कामांचे अमिष दाखवून काही मुस्लीम व्यवसायिकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत. परंतु असंख्य मुस्लीम समाज हा इमानाचा व देशाच्या घटनेचा कधीच सौदा करणार नाही अशी प्रतिक्रिया मुस्लीम मराठी संघाचे प्रमुख प्रतिनिधी सुभान शेख तसेच शकील कडू यांनी व्यक्त केल्या. मुरुड येथील अकिल खतीब यांच्या निवासस्थानी हा मेळावा आयोजित केला होता. तालुक्यातील असंख्य मुस्लीम कार्यकर्ते, मतदार व महिला मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले होते.