। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणावर वनक्षेत्र आसुन यात अनमोल अशा औषधी वनस्पती आहेत. परंतु दैनंदिन लागत असलेल्या आगीत या नष्ट होताना दिसत आहेत. मुरुड दत्त मंदिर जवळील डोंगरावर रात्रीच्या वेळी वनवा लागुन मोठया प्रमाणावर आग पसरली होती. या वनव्यामुळे लाख मोलाची वृक्षसंपत्ती आणि तृणभक्षी वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. त्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडण्यासाठी हे वणवे कारणीभूत ठरत आहेत. या तालुक्याला निसर्गाने अनमोल संपत्तीच्या रुपात पर्वत, नद्या, जंगले, वन्यपशू, पक्षी, तलाव, झरे, दर्या इत्यादी वरदान स्वरुपात दिले आहे. परंतु ही संपत्ती योग्यप्रकारे संरक्षण केली जात नाही.
मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होत असल्याने जमिनिवर पडलेला पाळापाचोळा वाळतो. तसेच अनेक वृक्षसुद्धा वाळतात. एवढेच नव्हे तर जंगलात झाडांपासून तुटून पडलेले, कापलेले किंवा वादळी वार्यामुळे उखडून पडलेले अनेक मोठे वृक्ष आणि फांद्या सुकलेल्या वाळलेल्या स्थितीत पडून असतात. एवढ्यात जंगलाला आग लागली की, संपूर्ण जंगल परिसरात वणवा भयावह रुप धारण करतो. त्यात पालापाचोळ्यासह किमती लाकूडसुद्धा जळून खाक होतात व लाख मोलाचे किमती लाकूड नष्ट होते.
तसेच पालापाचोळ्याखाली विचरण करीत असलेले अनेक छोटेमोठे कीटक, साप व इतर शेकडो प्रकारचे सरपटणारे जीवसुद्धा आगीत होरपडून मरतात. एकदा वणवा लागला की संपूर्ण जंगल परिसर व उंच पहाडापर्यंत वणवा भयावह रुप घेतो. त्यामुळे प्राणी-पक्ष्यांच्या कोवळ्या जीवांचा हकनाक बळी जात आहे. घरट्यातील पिले व वन्यप्राण्यांची नवी पिढी जळून खाक होत आहे. यावेळी होणारा पक्षी-प्राण्यांचा वणवा पेटवून मुक्या जीवांचा जीवघेणार्यांवर खटले दाखल करण्याची मागणी पक्षी-प्राणीप्रेमींकडून होत आहे.