। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या चार दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. समुद्रालाही उधाण आले आहे. अशातच गुजरातहून मासेमारी करण्यासाठी आलेले जहाज मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्याच्या मागील बाजूस कालपासून अडकले.
हे जहाज मोरे गावाच्या समुद्रकिनारी असलेल्या गावदेवी मंदिरापासून जवळपास 1 ते 2 किमी अंतरावर आहे. त्यातील खलाशांना वाचविण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचार्यांसहित तालुका प्रशासन प्रयत्न करीत असल्याची माहिती मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी दिली. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले आहे.
याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे वेळोवेळी माहिती घेत आहेत.






