। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्जत तालुका आगाराच्या माध्यमातून नेरळ येथील एसटी स्थानकमधून प्रवासी सेवा चालविली जाते. या स्थानकातील जमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम असल्याने एसटी आगार आणि एसटी महामंडळ यांना कोणत्याही प्रकारची प्रवासी सुविधा देणारी कामे करता येत नाहीत. त्यामुळे अवकाळी पावसानंतर एसटी स्थानकात पावसाचे पाणी साचले असून सर्वत्र चिखल गोळा झाल्याने प्रवाशांना एसटीत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कर्जत एसटी आगाराचे नेरळ येथे स्थानक आहे. या स्थानकातून कर्जत तसेच नेरळ परिसरातील ग्रामीण भागासाठी आणि मुरबाड करिता एसटी गाड्या सोडल्या जातात. त्यात या एसटी स्थानकाच्या बाजूलाच मध्य रेल्वेचे नेरळ रेल्वे स्थानक असल्याने प्रवाशांची कायम वर्दळ या एसटी स्थानकात असते. मात्र, नेरळ एसटी स्थानकात सुधारणा कामे केली जात नसल्याने पावसाळ्यात या ठिकाणी कायम पावसाचे पाणी साचलेले असते. तसेच, चिखलाचे डबके तयार झालेले असतात. यावर्षी मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामध्ये नेरळ एसटी स्थानकात चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे प्रवासी वर्गाला त्रासदायक ठरत आहे.