| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
थळ मतदारसंघात प्रत्यक्ष काम करणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाने आपली ओळख निर्माण केली आहे. विकासाच्या नावाखाली फक्त पाट्या आणि नारळ फोडण्यापेक्षा शेकापने तळागाळातील जनतेसाठी न बोलता काम करून दाखवले आहे. या सर्व कामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केला असून, सामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. या निवडणुकीत सुरेश घरत यांची कन्या सानिका घरत मैदानात उतरली आहे. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि तरुण चेहरा म्हणून सानिका घरत या थळ जिल्हा परिषद मतदारसंघाला नवी दिशा देऊ शकतात. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवाराची नसून, प्रामाणिक काम करणाऱ्या शेकापच्या विचारांची आहे, असे ठाम प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले. थळ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सानिका सुरेश घरत यांच्या प्रचारार्थ वरसोली तसेच थळमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस सुरेश घरत, थळ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सानिका सुरेश घरत, थळ पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार श्वेताली नरेंद्र थळकर आदींसह शेकाप, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, सत्तेच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना थळमध्ये धडा शिकवण्याची हीच वेळ असून, सर्व कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन शेकापचा झेंडा बुलंद करावा आणि सानिका घरत यांना बहुमताने विजयी करावे, असे आक्रमक आवाहन जयंत पाटील यांनी केले.
तसेच अलिबाग तालुक्याचा विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केला आहे. वरसोलीतील अनेक प्रश्न आपण पक्षाच्या माध्यमातून सोडविले आहेत. त्यामुळे आजही वरसोली येथील असंख्य नागरिक शेकापच्या पाठीशी कायम आहेत. वरसोलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत.
थळमधील आरसीएफ कंपनीमधील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेकापने कायम प्रयत्न केले आहेत. या भागातील कोळी समाजाचा विकास साधण्यासाठी भविष्यात उपाययोजना करु. व्यापाऱ्यांची असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आगामी काळात एक वेगळी भुमिका घेतली जाणार आहे. गावे, वाड्यांचा विकास अधिक वृध्दींगत कसा होईल याकडे पाहिले जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.
गावांतील विकासासाठी कटीबध्द : सानिका घरत
थळ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार आहे. मी तरुण पिढीची उमेदवार आहे. त्यामुळे तरुण पिढीच्या समस्या निश्चितच समजू शकते. हा जो आपला विभाग आहे, त्याठिकाणी मासेमारी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे मासेमारी व्यवसाय मागे पडत आहे. हा व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्या दृष्टीने तयारी केली जाईल. रस्ते, पाणी आदी समस्या या भागात आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. तरुण वर्गाला पुढे येण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांना योग्य तो रोजगार मिळाला पाहिजे, जेणेकरून त्यांचे आणि त्यांच्या भविष्याचे प्रश्न सुटतील. या भूमिकेतून आगामी काळात काम करण्याचा एक मानस आहे.
जनशक्तीची लढाई जिंकू : सुरेश घरत
प्रचाराला चांगला पाठींबा मिळत आहे. सर्व श्रेय माझ्या गावाला जात आहे. वरसोली व अनेक गावांमध्ये आपण कामे केली आहेत. या मतदार संघात विरोधकांनी एक वेगळी दहशत निर्माण केली आहे. या दहशतीविरोधात ही लढत आहे. दहशत मोडीत काढण्यासाठी रणशिंगे फुंकले आहे. कोरोनाचा काळात आमदार कुठे होते? त्यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील जनतेच्या हितासाठी धावून आल्या. आपल्यायला आमदारकीच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. सानिकाला निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सानिकाला निवडून आणून या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. धनशक्तीविरुध्द जनशक्ती ही लढाई आहे. ती जिंकण्यासाठी सज्ज व्हावा, असे आवाहन तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले.
मक्तेदारी मोडीत काढा
आजची लढाई लढत असताना रस्ते, पाणीपुरता समस्या मर्यादीत राहिल्या नाहीत. येथील मच्छिमांरासह खेळांडूंचे प्रश्नही कायमच आहेत. रोजगाराचे प्रश्नही गंभीर आहे. आरसीएफसारखी कंपनी जवळ असताना बेकारीचे जीवन जगण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. मग येथील आमदार आणि सदस्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सानिका घरत निवडून आल्यावर पहिले आंदोलन आरसीएफ कंपनीवर असणार आहे. येथील स्थानिकांसाठी ऑफलाईन परिक्षा झाली पाहिजे. त्यांना कंपनीत प्राधान्याने कायम घ्यावे, ही प्रमुख मागणी राहणार आहे. या मतदार संघात असलेली विरोधकांची मक्तेदारी दहशत मोडीत काढण्यासाठी ही लढाई असणार आहे. ही दहशत मोडीत काढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले.
