बोडणी जेट्टी बरोबरच सारळ घोळ प्रकल्पामुळे या भागाचा विकास
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे. नळपाणी पुरवठा योजनेतून सारळ मधील नागरिकांना पाणी मिळाले आहे. दिलेला शब्द पाळला आहे. बोडणी जेट्टी बरोबरच सारळ घोळ प्रकल्पामुळे या भागाचा विकास साधला जाणार आहे. रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील सारळ येथील पाच हजारपेक्षा अधिक गावांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नाने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सारळमध्ये नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली.
या योजनेचा लोकार्पण सोहळा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी आमदार पंडित पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा परिषद सदस्या भावना, पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, माजी उपसभापती प्रकाश ठाकूर, सारळच्या सरपंच अमृता नाईक, दिपक पाटील, रमेश पाटील, शिवानी नाईक, सुशील पाटील आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार जयंत पाटील म्हणाले, आपल्या प्रयत्नातून सारळ याठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे काम केले. या योजनेमुळे गावांमधील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यातून या भागातील अन्य गावांमधील पाण्याचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आहे. आमदारकीच्या निवडणूकीत आपल्याशी गद्दारी झाली .आपण गाफील राहिलो. त्यामुळे आपल्याला अपयश आले. त्यामुळे वेगळ्या उमेदीने पुन्हा सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. या भागात मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी पुरवठ्याची योजना आपण राबविणार आहोत. त्यामुळे संपुर्ण तालुक्याला एमआयडीसी द्वारे पाणी मिळणार आहे. सारळ घोळ धरणातून पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. याचे काम ही लवकरच केले जाईल. या भागाचा विकास बोडणी जेट्टीमुळे साधला जाणार आहे. रोजगाराचे साधन खुले झाल्यास आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असे आमदार जयंत पाटील म्हणाले.