बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी
| पेण | वार्ताहर |
शहराच्या नालेसफाईत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. यामुळे नाले तुंबलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय नगरपालिकेकडून राबवण्यात येत असलेला सूका कचरा आणि ओला कचरा मोहिमेला देखील हरताळ फासल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रशासनाने कचरा टाकणार्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी पेणकरांकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असणारे पेण शहराला विशेष महत्त्व आहे. येथे व्यापार्याच्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल दररोज होत असते. त्यामुळे पेण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र दर आठवड्याला करण्यात येणार्या नालेसफाईतून हजारो टन प्लास्टिक बाटल्या बाहेर काढण्यात येत असल्याने नगर पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. या प्लास्टिकच्या बाटल्यामुळे अनेकवेळा नाले तुंबली जात आहेत. शासनाच्या माझी वसुंधरा स्वच्छ अभियानांतर्गत अनेकदा पेण शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वेळोवेळी शहरातील नालेसफाई करण्यात येते. शिवाय ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना आवाहन देखील करण्यात येते. तसेच शहरामध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील येथील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या सर्रासपणे आढळून येत आहेत. त्यामुळे नगरपालिकेची डोकेदुखी वाढली आहे. या प्लास्टिकच्या कचर्याची पुरेपूर विल्हेवाट नगरपालिकेच्या माध्यमातून आंबेगाव येथील कचरा डेपोमध्ये करण्यात येते. मात्र नागरिकांना आवाहन करूनही दररोज नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या टाकण्यात येत आहेत. यामुळे प्रशासनाकडून प्लास्टिकच्या वापरावर कडक अंमलबजावणी तसेच कचरा टाकणार्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.