आ. जयंत पाटील यांचे गौरवोद्गार; अलिबागमध्ये डायलिसिस सेंटरचे उद्घाटन
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अलिबागमध्ये डायलेसिस सेंटर उभारून कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने एक चांगला समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा फायदा रुग्णांना चांगल्या पध्दतीने होणार आहे. त्यामुळे गिरीश तुळपूळे आणि कमळ हे कधीही वेगळे होऊ शकत नाही, याचा मला अभिमान आहे. असे गौरवोद्गार शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी (दि. 27) काढले.
अलिबागमधील कमळ नागरी पतसंस्थेमार्फत श्रीबागमध्ये अद्ययावत असे डायलिसिस सेंटर सुरु करण्यात आले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. त्यांच्या समवेत बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, रघुजीराजे आंग्रे, विवेक भागवत, अविनाश कोळी, कमळचे अध्यक्ष सतीश पाटील, डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. सौरभ पाटील, डॉ. हार्दिक शहा आदी मान्यवरांसह कमळचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक बहूसंख्येने उपस्थितीत होते.
यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले, प्रशासन कसे असावे आणि संस्थेचा कारभार कसा करावा हे कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांच्याकडून शिकावे. सहकार चळवळीच्या भरभराटीमध्ये त्यांचे योगदानदेखील मोलाचे राहिले आहे. पतसंस्था एक हजार कोटीपर्यंत जाईल असा विश्वास मला होता. हे मी देशमुख आणि चाळके यांना बोलून दाखविले होते. तो दिवस आता जवळ येत आहे. त्यामुळे कमळ नागरी सहकारी संस्थेने यापेक्षा अधिक जोमाने काम करावे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
पुढे आ. जयंत पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भुषविताना, जिल्हयातील सहकार चळवळीमध्ये वेगवेगळया माध्यमातून जवळ जवळ दोन हजार संस्था या ठीकाणी उभ्या केल्या आहेत. ते करत असताना केंद्र बिंदू कधी सोडला नाही. या जिल्हयातील सहकारी चळवळ आणि संस्था या माझ्या आहेत या भुमीकेतून प्रयत्न केला. त्यामुळे प्रत्येकाला आजपर्यंत सहकार्य करत आलो आहेे. या ठिकाणी पाच अर्बन बँका बुडाल्या. त्या पाचही बँकांना शेवटपर्यंत मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.