19 कुटुंबांवर उपासमारीची वेळ
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील खोराबंदरातील अजब गजब प्रकार पहायला मिळत आहे. एम.एम.बी.चा स्थानिक भुमीपुत्रांवर अन्याय होत आहे. या अन्यायामुळे 19 जणांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून बोटीसाठी काढलेल्या कर्जाचा हप्ता भरणार कसा, असा सवाल स्थानिक भूमिपुत्रांना पडला आहे.
मुरुड तालुक्यातील खोराबंदरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या ठिकाणी जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत आहेत. त्यामुळे काही बाहेरच्या लोकांनी संधी साधून या ठिकाणी फेरी बोट सेवा सुरु केली आहे. पर्यटकांची वाढती रेलचेल पाहता या बोट मालकांनी एकाच्या दोन, दोनचे तीन असे करत चार-चार बोटी सुरू केल्या आहेत. अजुनही काही बाहेरच्या लोकांनी संधी साधून या ठिकाणी बोटी सुरू केल्या आहेत. अशा आता एकूण सात बोटी सुरू आहेत.
खोराबंदर येथील स्थानिक भूमिपुत्रांनी याठिकाणी फेरी बोट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यासाठी लागणार्या सर्व कायदेशीर बाबी परवाने मिळवून एक नवीन बोट तयार केली आहे. या बोटीचे दोन मार्च रोजी श्रीफळ वाढवून उद्घाटनही करण्यात आले होते. परंतु, या बंदर अधिकार्यांचा वरदस्त लाभलेल्या बाहेरील बोट मालकांच्यामुळे स्थानिक बोटमालकांना याठिकाणी संधीच देण्यात आलेली नीही. सध्या पर्यटकांचे प्रमाण कमी असल्याने बाहेरून आलेल्यांना आधी संधी दिली जात आहे. आज ज्या चार बोटिंना संधी देण्यात येते त्याच बोटींना दुसर्या दिवशी संधी देण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्यानंतर शेवटला आहेत त्यांना कधीच संधी मिळत नाही. त्यामुळे या बोटीवर काम करणारे खलाशी व बोट बनवणारे स्थानिक भूमिपुत्र अशी एकूण 19 जणांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
नंबर मिळत नसल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी (दि.22) मार्च रोजी एमएमबीच्या अलिबाग कार्यालयात जाऊन उपसंरक्षक तथा प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सी.जे. लेपांडे यांना विनंती केली कि, गेले महिनाभर आम्हाला संधीच मिळत नाही. तरी सर्वांना राऊंड पद्धतीने करण्यात यावे. जेणेकरून सर्वांना नंबर मिळेल. या विनंतीला मान देऊन लेपांडे यांनी त्याच दिवशी एक एप्रिलपासून राऊंड पद्धतीने फेरी बोट सुरू करण्याचे पत्रद्वारे खोराबंदर अधिकारी यांना कळविण्यात आले होते. एक तारखेला आपल्याला नंबर मिळेल या आशेने स्थानिक भूमीपुत्र आनंदात असताना अचानकपणे कुठेतरी माशी शिंकली व अचानक दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचे कळविण्यात आले. याचे कारण ही अजब गजब देण्यात आले. आचारसंहिता असल्यामुळे राऊंड पद्धतीने फेरीबोट सुरू करता येऊ शकत नाही, असे कळविण्यात आले.
आचारसंहिता व पर्यटक फेरीबोट यांचा कुठेही काडीमात्र संबंध नसताना हे कारण दिल्यामुळे स्थानिक भुमीपुत्रांवर एम.एम.बी.ने मोठा अन्याय केल्याची चर्चा असून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 19 जणांच्या कुटुंबावर गेले महिनाभर अन्याय करुन उपासमारीची वेळ आणली आहे. याला सर्वस्वी एम. एम. बी चे अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.