जसवलीत दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावामध्ये रमजान महिना सुरू असतानाच दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून दोन्ही गटांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत होते. परंतु, दोन्हीही गट पोलिसांचे ऐकायला तयार नसल्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून जमलेल्या जमावाला पांगविले.

जसवली गावामध्ये होळीचे मैदान आहे. या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते. याच ठिकाणी हिंदू ग्रामस्थांची सान भरली जाते. ज्या ठिकाणी सान भरली जाते, त्या ठिकाणी धर्मध्वज लावण्यात आलेले होते. या धर्मध्वजाच्या शेजारीच दुसर्‍या गटातील लोकांनी त्यांच्या धर्माचे झेंडे फडकविल्यामुळे दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत सौम्य लाठीमार केला व जमावाला पांगविले.

 या प्रकारानंतर जसवली गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, संपूर्ण गावामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची गस्त वारंवार सुरू आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन शहरातदेखील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यावेळी कोकणचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी श्रीवर्धन या ठिकाणी येऊन गावातील नागरिकांच्या बैठका घेऊन शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. दोन्ही गटामधील लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली आहे. तर, सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये अजून जे काही गुन्हेगार दिसतील, त्यांनादेखील अटक करण्यात येईल, असे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version