नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा भाजप हा एक दीर्घद्वेषी पक्ष आहे. आपल्याला त्रास देणाऱ्या शत्रुला नष्ट करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील खासदारकी रद्द करणे हा त्याचाच आविष्कार आहे. मोईत्रा यांनी पूर्वी भाजपचे निशिकांत दुबे यांची एमबीएची पदवी बनावट असल्याचा आरोप केला होता. त्यांनाच मोईत्रा यांच्याविरोधात आरोप करण्यासाठी भाजपने पुढे केले. विरोधकांबाबत अत्यंत आक्षेपार्ह शेरेबाजी करण्याबाबत दुबे प्रसिद्ध आहेत. महुआ यांनी मोदींच्या राजवटीवर आपल्या फर्ड्या इंग्रजीत वेळोवेळी टीका केली. त्यांचे बोलणे-वागणे एखाद्या चित्रपट तारकेप्रमाणे स्टाईलिश आहे. त्यामुळे तरुण वर्गात त्यांच्या भाषणांच्या क्लिप्स विशेष लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ, फॅसिझमबाबत त्यांनी केलेले भाषण. मोईत्रा यांनी लोकसभेत अदानी आणि मोदी यांच्या संबंधांविषयी सातत्याने सवाल उपस्थित केले. महुआंनी पूर्वी अमेरिकेत अर्थ क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांना त्यांची भाषा समजते व पटते. हेच मोदी सरकारला अनेक दिवसांपासून सलत होते. त्याचमुळे महुआ यांचा काटा काढण्यात आला आहे. त्यासाठी अतिशय पद्धतशीर योजना आखून त्या विविध प्रकारे बदनाम होतील हे पाहिले गेले. यापूर्वी अगदी इंदिरा गांधींच्या काळातही इतका दीर्घ पल्ल्याचा द्वेष आपल्या विरोधकांबाबत दाखवला गेलेला नाही. आपण एका भयंकर खुनशी राजवटीत राहत आहोत याची जणू जाणीवच महुआ प्रकरणाच्या निमित्ताने सर्व विरोधकांना करून दिली गेली आहे. मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या खासदार असून ममता बॅनर्जींचा करिश्म्यामुळेच त्या विजयी झाल्या असणार यात शंका नाही. मात्र त्यांची संसदेतील कामगिरी ही त्यांच्या स्वयंप्रज्ञ राजकारणाची चुणूक दाखवणारी होती. संसदेतील त्यांची उपस्थिती सुमारे 85 टक्के म्हणजे इतर खासदारांहून अधिक आहे. शिवाय त्यांची बहुतेक भाषणे ही मोदींवरच्या टीकेमुळे चांगलीच लक्षवेधी ठरली. म्हणजे त्या अत्यंत प्रभावीपणे आपले काम करीत होत्या.
प्रश्नाचे हत्यार
मोईत्रांनी खासदार म्हणून प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतले असा त्यांच्यावरचा मुख्य आरोप आहे. संसद वा विधिमंडळांमध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो. यात खासदार वा आमदार लेखी प्रश्न विचारतात. त्यांना ते काही दिवस आधी सादर करावे लागतात. मग सरकारी यंत्रणा या प्रश्नांची उत्तरे तयार करते व मंत्री ती सभागृहात देतात. यातील काही प्रश्नांची लेखी उत्तरांच्या पलिकडे चर्चा होते. खासदार त्याबाबत उपप्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडू शकतात. यातील उत्तरे ही सरकारची अधिकृत व कायदेशीर भूमिका असते. त्यामुळे मंत्र्यांना फार काळजीपूर्वक विधाने करावी लागतात. म्हणूनच, कोणतेही सरकार अजूनही या प्रश्नोत्तरांना घाबरते. भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी, एखाद्या अधिकाऱ्याची बदली वा निलंबन, एखाद्या योजनेसाठी अधिक रकमेची तरतूद अशा गोष्टी या प्रश्नोत्तरातून साध्य करता येतात. त्यामुळे हे प्रश्न हे विरोधकांचे हत्यार असते. महुआ यांनी अदानीच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली होती. त्यामुळे त्याबाबत त्या काही प्रश्न विचारणार हे उघड होते. मात्र इथे हेच हत्यार त्यांच्यावर उलटवण्याचा प्रयत्न झाला आहे. उद्योगांमधील अदानीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना फायदा व्हावा या हेतूने महुआ यांनी प्रश्न विचारले असा बनाव तयार करण्यात आला. त्यासाठी त्यांच्याच जुन्या मित्रांना माफीचे साक्षीदार करण्यात आले. खासदार वा आमदारांना आपले प्रश्न मेल करण्यासाठी विशिष्ट लॉगइन व पासवर्ड दिलेला असतो. महुआ यांनी हा पासवर्ड दर्शन हिरानंदानी या बिल्डर कुटुंबातील व्यावसायिकाला दिला व त्याने महुआंच्या खात्यावरून अदानीच्या विरोधातील काही प्रश्न विचारले असा त्यांच्यावरचा आरोप आहे. महुआ यांनी हा पासवर्ड आपण दिला होता हे मान्य केले. मात्र त्या बदल्यात आपल्याला काही पैसे मिळालेले नाहीत हे ठासून सांगितले. दुर्दैवाने यातील काही गोष्टी त्यांच्या विरोधात जाणाऱ्या ठरल्या.
अदानीच्या बचावासाठी
हिरानंदानी हा काही कंत्राटांमध्ये अदानीचा प्रतिस्पर्धी होता हे उघड होते. शिवाय, महुआ यांना या हिरानंदानीने काही महागड्या भेटी दिल्याचे व त्याची गाडी काही वेळा महुआंनी वापरल्याचे दिसून आले. महुआ यांनी यातील एकही गोष्ट अमान्य केली नाही. मात्र मित्र म्हणून हिरानंदानी याने केलेल्या गोष्टी आणि विचारलेले प्रश्न यांचा काहीही संबंध नाही असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण हे सर्व प्रकरण पाहता भाजपने हिरानंदानी याचा अत्यंत धूर्तपणे वापर करून घेतला हे स्पष्ट दिसते. त्यामुळेच हा एकेकाळचा मित्र आता त्यांच्या विरोधात साक्ष देतो आहे. यात गंमत अशी आहे की, महुआने विचारलेले अदानीबाबतचे प्रश्न प्रत्यक्षात पटलावर आले का, त्यामुळे सरकारची काय पंचाईत झाली किंवा अदानीचे काय नुकसान झाले हे सगळेच गुलदस्त्यात आहे. महुआने प्रश्न विचारले म्हणून अदानीचे एखादे कंत्राट रद्द झाले किंवा सरकारवर दबाव आला असे कोठेही घडलेले नाही. तरीही वर म्हटल्याप्रमाणे निव्वळ खुनशीपणे घेरण्यात आले आहे. वास्तविक सर्वच खासदार आपला पासवर्ड आपले कर्मचाऱ्यांना देतात व तेच खासदारांच्या वतीने प्रश्न फाईल करीत असतात. मात्र महुआंना यात बळीचा बकरा बनवण्यात आले. त्यासाठी अनेक पातळ्यांवर महुआंचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला. महुआ या आपल्या जोडीदारापासून विभक्त झालेल्या आहेत. अशा स्थितीत दर्शनसारख्या मित्रांबरोबर त्यांची कशी जवळीक आहे तसेच त्या आपले खासदार म्हणून कर्तव्य पार पाडताना कशा नीतीमान नाहीत हे दर्शवण्याची ही धडपड होती. यासाठी नेमलेल्या संसदेच्या एथिक्स कमिटीमध्ये त्यांची वाईट रीतीने उलटतपासणी घेण्यात आली. अखेर या समितीचा 495 पानांचा अहवाल संसदेपुढे मांडून चर्चेची संधी न देताच एका तासात महुआंची खासदारकी रद्द करण्यात आली. महुआंना बदनाम करून दूर करण्याचे कारस्थान यशस्वी झाले आहे. मात्र अदानी हा सरकारच्या उरात रुतलेला काटा असून त्याच्या बचावासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकते हे या निमित्ताने पुन्हा एकवार स्पष्ट झाले.