छायाचित्र काढण्याचा मोह बेतला जिवावर

पेजनदीमध्ये खडकावरून पाण्यात उडी मारली आणि वाहून गेला
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळनजीकच्या मिरचोली गावाच्या परिसातून वाहणाऱ्या पेज नदीमध्ये एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी नदीच्या प्रवाहात बुडालेल्या या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी नदीपात्रात सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. पेज नदीमध्ये असणाऱ्या खडकावर आणि पाण्यात उड्या मारण्याचे छायाचित्र काढण्याच्या नादात या तरुणाचा नदीत तोल जाऊन तो तरुण बुडाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

कर्जत तालुक्यातील गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील अंधेरी परिसरातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळी नेरळ जवळील मिरचोली येथे पर्यटनासाठी आले होते . दुपारी जेवणानंतर व्यवसायाने कला दिग्दर्शक असलेले सुकांत पाणीग्राही यांचा मुलगा सौजस याच्यासोबत पर्यटनासाठी आलेले गौतम , शुभम , यश , भुषण आणि आदित्य असे सर्वजण नेवाळी गावाच्या हद्दीत वाहत असलेल्या पेज नदीकिनारी फिरण्यासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी गेले.

आदित्य मोरे यास पोहता येत नसल्याने नदीमधील खडकावर बसून तो छायाचित्र काढत होता. आपले विशेष छायाचित्र काढण्यासाठी त्याने नदीच्या पाण्यात उडी मारली आणि तो पाण्यात खोल जावून दिसेनासा झाला. नदीच्या प्रवाहाचा वेगात तो वाहून गेला. नदीच्या आजूबाजूला असलेल्या स्थानिकांनी पाण्यात बुडालेल्या आदित्यचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आदित्यचा शोध लागला नाही. यामुळे नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे आणि सहाय्यक पोलिस उप निरीक्षक किसवे यांच्याकडून खोपोली येथील शोध पथकाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत या पथकातील गुरुनाथ साठेलकर,विजय भोसले,अमोल कदम,राजेश पारथे, निलेश कुढले, अमोल ठाकेकर,विशाल चवण, सौरभ घरात,महेश भोसले, प्रेम पाटील, संतोष मोर,मोहन पवार, भक्ती साठेलकर यांनी नदीमध्ये बोटी घेवून तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपास लागला नसल्याने अखेर मध्यरात्री तपास मोहीम थांबवण्यात आली.

शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजता घटना घडलेल्या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर आदित्यचा मृतदेह आढळून आला. मृतदेह रुग्णवाहिकेतून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून आदित्यला मृत घोषित केले. शव विच्छेदन करून आदित्यचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.पर्यटनासाठी आलेला तरुण आदित्य मोरे यांच्या मृत्यूबाबत कोणताही संशयाचा प्रकार नसुन फिर्यादी यांची कोणाविरुध्द काही एक तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली नाही.त्यामुळे आदित्य मोरे यांच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

Exit mobile version