15 कोटी 84 लाख रुपयांचा भरणा; 31 डिसेंबरला संपणार मुदत
। रायगड । प्रतिनिधी ।
थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने आणलेल्या अभय योजनेचा कल्याण व भांडुप परिमंडलातील 9 हजार 384 जणांनी लाभ घेतला असून त्यांनी 15 कोटी 84 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
थकीत रकमेवर विलंब आकार व व्याजमाफीसह मूळ थकबाकीत 5 ते 10 टक्क्यांची सवलत या ग्राहकांनी मिळवली आहे. तर यातील साडेपाच हजार जणांच्या मागणीप्रमाणे त्यांची घरे पुन्हा प्रकाशाने उजळण्यासाठी वीजजोडणी देण्यात येत आहे.
31 डिसेंबरला या योजनेची मुदत संपत असून लाभापासून वंचित दोन्ही परिमंडलातील उर्वरित ग्राहकांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करून संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अभय योजनेनुसार मार्च-2024 अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ होईल. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तर थकबाकी एकरकमी भरणार्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर 5 टक्के आणि लघुदाब ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे.
मूळ थकबाकी एकरकमी अथवा 30 टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे तत्काळ पुन:र्जोडणी अथवा नवीन वीजजोडणी मिळेल. त्यासाठी पात्र ग्राहकांनी https://wss.mahadiscom.in/wss/wss या पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
कल्याण परिमंडलातील 6 हजार 394 ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील 5 हजार 427 ग्राहकांनी आत्तापर्यंत 6 कोटी 64 लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी 3 हजार 596 जणांनी पुन:र्जोडणी अथवा नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे.
भांडुप परिमंडलातील 4 हजार 408 ग्राहकांनी अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. यातील 3 हजार 691 ग्राहकांनी आत्तापर्यंत 9 कोटी 20 लाख रुपयांचा भरणा केला असून त्यापैकी 1 हजार 900 जणांनी पुन:र्जोडणी किंवा नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे.